
Sangli News : नुकसाच सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. यामुळे आता भाजपसह शिवसेना शिंदे गट सक्रीय झाला असून काँग्रेसने देखील थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याचपार्श्वभूमिवर काँग्रेसने बूथपासूनच नव्याने पक्ष बांधणीचा निर्णय घेतला आहे. नेत्यांचे पाहुणे, वशिल्याने आलेले आता बाजूला केले जातील. ज्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनाच पद दिले जाईल. काँग्रेस सर्वच पातळीवर नवीन सैन्यभरती पक्षाचे कवच कठोर करेल अशी, अशी भूमिका जिल्ह्याचे निरीक्षक, माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी मंगळवारी (ता.22) पत्रकार परिषद घेत मांडणी केली.
काँग्रेस कमिटीत शहर जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ‘धूळ साचली आहे, थोडी फुंकर मारावी लागेल’, असे सांगत नव्याचे रचनेचे संकेत दिले. जिल्हाभरातून विविध पदांसाठी इच्छुक असणारे आणि त्यात निकषावर पात्र ठरण्याची क्षमता असणाऱ्यांची यादी दोन दिवसांत प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सहनिरीक्षक आदित्य पाटील उपस्थित होते. तर गेल्या काही दिवसांपासून अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याबाबत रंगलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून देखील रूपनवर यांनी स्पष्टीकरण देताना, पाटील हे काँग्रेससोबत असून ते काँग्रेसचे शंभरावे खासदार आहेत, असे म्हटलं आहे.
रूपनवर म्हणाले, ‘‘गेल्या पंधरा दिवसांत ग्रामीणचे बारा ब्लॉक आणि आज तीन शहर ब्लॉकच्या बैठका मी घेतल्या. त्यातून हाती आलेल्या निरीक्षणाच्या आधारे प्रदेशला अहवाल सादर केले जाईल. काँग्रेस संघटनात्मक पातळीवर मजबूत केली जात आहे. राष्ट्रीय काँग्रेसकडून तसे आदेश आले आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष गांभिर्याने त्यात लक्ष घालत आहेत. हा बदल महत्वाचा असेल.
सध्या देशात मुघल आणि ब्रिटीश काळाहून वाईट परिस्थिती आहे. हिंदूचे राज्य आहे म्हणतात आणि हिंदू आक्रोशही करतात. निव्वळ धर्माच्या नावाने ध्रुवीकरण केले जातेय. याविरोधात जनतेत रोष आहे. लोक आता कुजबूज करताहेत. लोकशाहीच्या चारही स्तंभांची आता जबाबदारी आहे, या स्थितीतून पुन्हा सावरायचे आहे. ते काम काँग्रेसच करेल आणि राहूल गांधी त्याचे नेतृत्व करतील, असेही रूपनवर म्हणाले.
बंडखोरीला संघटनेत स्थान नाही
काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षातून बंडखोरी होते, हे दुर्दैवी होते. बंडखोरीविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी बंडखोरीला साथ दिली, त्यांना संघटनेत स्थान दिले जाणार नाही. बंडखोरांचे पुढे काय करायचे हे प्रदेश काँग्रेस ठरवेल, असेही संकेत रूपनवर यांनी दिले आहेत.
भाजप दबाव टाकतंय
यावेळी पार पडलेल्या बैठकीला सांगली, मिरजेतील बहुतांश माजी नगरसेवकांनी दांडी मारली. यावरून रूपनवर यांनी, भाजप दबाव टाकतंय, भिती घालतंय, यामुळे काही लोक घाबरून पक्ष सोडताहेत. ही स्थिती गंभीर असल्याचेही रूपनवर यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.