Solapur News : राष्ट्रवादी फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांचा नाशिक दौरा चांगलाच गाजला होता. यानंतर पवार आता सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आल्याने हाही दौरा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याची हालहवा काय आहे, राजकीय स्थितीबाबत पवारांनी अनेक मान्यवरांशी बैठक घेऊन चर्चा करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यात पवारांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांच्याशी केलेला एकत्रित प्रवास आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेबाबत जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे. (Latest Political News)
मंगळवेढ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटलांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार करून पवारांनी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या निवासस्थानी जेवण केले. यानंतर ते सांगोला येथे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी रवाना झाले. मंगळवेढा ते सांगोला प्रवासादरम्यान पवारांच्या वाहनात शिवाजीराव काळुंगे, अभिजित पाटील होते. यावेळी त्यांच्यात तालुक्याच्या राजकीय, कारखानदारी, बँक, पाणी प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती आहे.
राज्यात अडचणीत आलेली कारखानदारी व कारखानदारी त्यावर करावयाचे उपाय योजना यावर शरद पवारांना मोठे ज्ञान असल्याने राजकीय नेते त्यांचे मार्गदर्शन घेतात. कारखानदारीमध्ये पवारांचे योगदान मोठे असले तरी जिल्ह्यातील साखर कारखानदारी टिकवण्यात मंगळवेढ्याचे काळुंगे यांचे योगदान मोठे ठरले आहे. त्यांनी जिल्ह्यातील ७० टक्केहून अधिक साखर कारखान्याला धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेटच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले.
पवारांनी मंगळवेढा ते सांगोला प्रवासात त्यांनी तालुक्यातील कारखानदारीबद्दल माहिती घेतली.तालुक्यात उसाचे क्षेत्र किती उपलब्ध आहे, पाऊस नसल्यामुळे ऊस शेतीवर होणारा परिणाम,यामुळे बँका चालवताना येणाऱ्या अडचण व बँकेचा 'एनपीए' कमी करण्याबाबत सूचना पवारांनी केल्या. तर शिवाजीराव काळुंगे यांनी दोन महिन्यात साखर कारखानदारी सुरू होणार आहे. तत्पूर्वी पाऊस लांबल्याने बहुतांश उसाचा वापर चाऱ्यासाठी झाल्यामुळे आणखी उर्वरित दोन महिन्यात किती ऊस चाऱ्याला जाणार आणि किती साखर कारखाने सुरू होणार, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
तालुक्यातील स्थिती पाहता शासनाने चारा छावण्या व चारा डेपो सुरू करण्याची गरज आहे. यावर कागदपत्रे चालढकल करण्यापेक्षा तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे. याशिवाय तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी घेतलेल्या रौप्यमहोत्सवी पाणी परिषद, ३१ व्या पाणी परिषदेची माहितीही काळुंगेंनी पवारांना दिली. तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी शासन स्तरावर प्रलंबित असलेले मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजुरीसह निधी उपलब्ध करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती काळुंगेंनी केली. याशिवाय पाणी परिषदेच्या कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण काळुंगेंनी दिले असता पवारांनी त्यासाठी होकार दिल्याचेही समजत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.