

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास सेवा सोसायट्यांचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातही जावळी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आखाडे आणि आलेवाडी येथील विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला.
विशेष म्हणजे, हा प्रकार सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत घडला. त्यामुळे या घटनेची जिल्हाभर चर्चा रंगली आहे. या घटनेनंतर शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख अंकुशबाबा कदम यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले.
जावळी तालुक्यात त्यांच्या समर्थकांकडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. दडपशाहीच्या वातावरणात विकास सेवा सोसायट्यांचे ठराव मंजूर करून घेतले जात आहेत. ठराव प्रक्रियेदरम्यान विरोधकांना धमकावणे, कार्यकर्त्यांवर दबाव आणणे आणि मतभेद मांडणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचे वातावरण निर्माण करणे लोकशाहीला घातक असल्याचाही दावा कदम यांनी केला.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत असताना सहकार क्षेत्रातील राजकारण अधिकच तापू लागले आहे. विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेवरून सुरू झालेला हा वाद आगामी निवडणुकीत आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मात्र, अंकुशबाबा कदम यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
शिवेंद्रराजे अन् शशिकांत शिंदेंमध्ये जोरदार रस्सीखेच :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक येत्या तीन महिन्यांत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहकारी सोसायट्यांकडून मतदानासाठी ठराव करण्यात येत आहेत. जावळी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात ठरावावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहेत