

Solapur News : सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणूसकीचे दर्शन याची आज दिवसभर चर्चा होती. त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे तब्बल आठ तास दर्शन रांगेत थांबलेल्या आमरावती जिल्ह्यातील एका वृध्द ऐंशी वर्षांच्या आजीला थेट देवाचे दर्शन घडवले. दर्शनानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन हे माझ्यासाठी भक्त पुंडलिकाच्या रूपात धावून आल्याची भावना त्या आजीने व्यक्त केली.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी आठ किलोमीटर पर्यंत रांग गेली आहे. याच दर्शन रांगेत मोर्शी तालुक्यातील पद्माजा वारसे या ऐंशी वर्षांच्या आजी देखील उभ्या होत्या. शरीर थकलेले, धड नीट चालता ही येत नाही, तरीही सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने जीवाची पर्वा न करता तब्बल आठ तासाहून अधिक वेळ त्या रांगेत चालत होत्या.
याच वेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर दर्शन रांगेची व्यवस्था पाहण्यासाठी आले होते. ते रांगेतील भाविकांशी संवाद साधत होते. याच दरम्यान जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची नजर दर्शन रांगेत चालणार्या वयोवृद्ध 80 वर्षाच्या आजीकडे गेली.
यावेळी तत्काळ त्यांनी त्या आजीला बाजूला घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या आजीने मी केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभी राहिली आहे. एकदा का माझ्या विठुरायाचे दर्शन झाले की मी डोळे मिटायला रिकामी झाले, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आजीचे शब्द ऐकून जिल्हाधिकाऱ्यांचे ही डोळे पानावले. संवेदनशील असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट त्या माऊलीला बाजूला घेऊन थेट पदस्पर्श दर्शन देण्याची व्यवस्था केली. हे पाहून आजीच्या डोळ्याची पाणी तराळले, कंठ दाटून आला. पांडुरंगा माझं तू गारानं ऐकलं आणि मला थेट तुझे दर्शन मिळाले, मी भाग्यवान ठरले. देव तुमचं भलं करो असा आशीर्वाद ही त्या आजीने दिला. हा सगळा प्रसंग पाहून उपस्थितांचेही मनगहिवरून आले.
भक्त पुंडलिकाने आपल्या वृध्द आई वडीलांना कावडीमध्ये बसवून देवदर्शन घडवले होते. त्याचीच प्रचिती आजच्या या प्रसंगाने सर्व वारकर्यांना आली. यावेळी दर्शन रांगेतील उपस्थित भाविकांनी जिल्हाधिकारी एस कार्तिकीय व मंदिर समितीने दाखवलेल्या माणूसकी बद्दल आभार व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे आदी उपस्थित होते.
वारकरी हाच खरा व्हीआयपी
जिल्हाधिकार्यांनी व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ पाच ते सहा तासांनी कमी झाला आहे. त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. आज दर्शन रांगेच आमरावती जिल्ह्यातील ऐंशी वर्षीच्या आजी उभ्या होत्या. त्यांना चालताही येत नव्हते. त्यांना त्रास होत होतात. अशावेळी त्यांची परिस्थिती पाहून त्या आजीला थेट दर्शन देण्यात आले. आमच्यासाठी हेच खरे व्हीआयपी वारकरी आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. विशेष स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
-एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.