Kolhapur Politics : काँग्रेस पक्षाने यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळला, पण निवडून आलेल्या मित्रपक्षाचे उमेदवार अन्य राजकीय पक्षात गेले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट असून, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा पक्षाने लढवाव्यात, अशी जोरदार मागणी पुण्यात झालेल्या पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आढावा बैठकीत करण्यात आली.
आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यातील बारा तालुके आणि दहा विधानसभा मतदारसंघांतील बूथ कामाचा आढावा घेतला. बूथचे काम कागदपत्री न करता वस्तुनिष्ठपणे करावे, असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. या वेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. शिक्षक मतदारसंघ आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षाचे जबरदस्त आव्हान असतानाही आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणूक जिंकून दाखवल्या. जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँक, साखर कारखाने, अन्य सहकारी संस्थेत काँग्रेसची मजबूत पकड आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. ,
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेसने संघटन बळकट केले असून, आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसने लढवावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. इचलकरंजीतील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक लढवायची मागणी केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही नाना पटोले यांनी या वेळी केले.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.