
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर पाच मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी निकालावर शंका उपस्थित करत व्हीव्हीपॅटची मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या पाच उमेदवारांनी त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतले असून कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील 44 केंद्रांवर ‘मॉक पोल’ होणार आहे. या ‘मॉक पोल’ची तारीख काही दिवसानंतर संबंधित तक्रारदार उमेदवारांना देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
विधानसभा निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच पक्षांना धक्का बसला. जिल्ह्यातील 10 पैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून न आल्याने काहीजणांनी निकालावर शंका उपस्थित केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पाच उमेदवारांनी देखील निकालावर शंका उपस्थितीत करत राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. शिरोळ, करवीर, कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी केली होती.
निकालानंतर अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम (EVM) मतमोजणीबाबत शंका उपस्थित केली होती. पराभूत उमेदवारांना आणि विजयी उमेदवारांना काही केंद्रांवर कमी जास्त मत मिळाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी त्यांची दखल घेतली नव्हती. निकालानंतर सात दिवसांत, अशा प्रकारच्या तक्रारी थेट आयोगाकडे दाखल करण्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीर, शिरोळ व हातकणंगले, अशा पाच मतदारसंघांतून प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली होती.
ज्या मतदान केंद्रावर कमी जास्त मतांचा फरक दिसत आहे, अशी तक्रार संबंधित उमेदवारांनी केली आहे. त्या मतदार केंद्रावरील पूर्वी पडलेली मते काढून टाकून त्या उमेदवाराला नवीन चिन्हं देऊन प्रत्येकी चौदाशे मते नव्याने नोंदवली जाणार आहेत. त्यालाच 'मॉक पोल' असे म्हणतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील 44 मतदान केंद्रावर, अशा पद्धतीचे 'मॉक पोल' केले जाणार आहे. मात्र त्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. ती लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून संबंधित उमेदवाराला देण्यात येणार आहे. ही तारीख निश्चित झाल्यानंतर त्या अगोदर तीन दिवस एखाद्या तक्रारदाराने आपला आक्षेप मागे घेतला, तर संबंधित तक्रारदारांचे पैसे परत देण्याची निवडणूक आयोगाच्या कायद्यात तरतूद आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.