
Solapur, 08 December : प्रशासनावरील येथील जनतेचा विश्वास कमी झाला आहे, असे मला अजिबात वाटत नाही. जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला असता तर इथं बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती, असे विधान सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. तसेच, ‘ईव्हीएम’बाबत अफवा पसरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ईव्हीएमच्या विरोधात ठोस भूमिका घेणारे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) ग्रामस्थांशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संवाद साधला. या वेळी जयंत पाटील, विद्या चव्हाण, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर हे उपस्थितीत होते. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी सुटी असूनही तातडीने पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत खुलासा केला.
जिल्हाधिकारी ((Collector )) कुमार आशीर्वाद म्हणाले, बांगलादेशमध्ये लोकांना निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिला नव्हता, त्यानंतर बांगलादेशात विद्रोह झाला होता. तसा प्रकार कुठेही नाही. प्रशासकीय यंत्रणेवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. ईव्हीएमवर (EVM) जर काही लोक अविश्वास दाखवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असतील त्यावर आमची ही प्रेस कॉन्फरन्स आहे. ईव्हीएमवर तुमचं मत बनविण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेली माहिती एकदा वाचून घ्यावी. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळत जाईल.
रविवारची सुटी असूनही सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारकडवाडी प्रकरणी खुलासा करावा लागत आहे. तुमच्यावर काही दबाव वैगेरे आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा प्रकार केवळ मारकडवाडीतच झाला आहे आणि मारकडवाडी सोलापूर जिल्ह्यात आहे. मी सोलापूरचा जिल्हाधिकारी आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया माझ्या नेतृत्वाखाली झाली आहे, त्यामुळे मी याप्रकरणी जे संशयाचे वातावरण ईव्हीएमबाबत निर्माण केला जात आहे, त्याबाबत आपण स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असा निर्णय मी ही पत्रकार परिषद घेत आहे.
ईव्हीएमबाबत जे लोक अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसारच आम्ही ८९ लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. जे लोक संभ्रम निर्माण करत आहेत, त्या प्रत्येकावर आपण कारवाई करू शकत नाही. लोकांचं प्रबोधनही केलं जाईल, असेही आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
मारकडवाडीतील काही लोक उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. त्याची माहिती घेऊन मी आणि पोलिस अधीक्षक याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पण, आम्ही नायब तहसीलदार, तहसीलदारांना पाठवून मारकडवाडीच्या लोकांना समजून सांगू. त्यानंतरही अफवा पसरविण्याचे काम सुरूच राहिले तर आम्ही कडक कारवाई करू, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.