
Solapur, 09 June : सोलापूर-गोवा प्रवासी विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सर्व आमदार-खासदारांच्या उपस्थितीत या विमानसेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री गोरे आणि केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. ‘सोलापूर-मुंबई विमानसेवेची ग्यारंटी देऊनच इथून जायचं’ असा दम पालकमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भरला, त्याला मोहोळ यांनी ‘सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मुहूर्त सांगून आता तरी पालकमंत्री मला जाण्याची परवानगी देतील, असे उत्तर दिले.
प्लाय-९१ या विमान कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-गोवा विमानसेवेला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे आणि मुरलीधर मोहोळ (murlidhar Mohol) यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले. गोरे यांनी आपल्या भाषणात सोलापूर-मुंबई विमानसेवेबाबत ग्यारंटी देण्याचा आग्रहच धरला.
सोलापूर-गोवा विमानसेवेवर आम्ही समाधानी नाही. सोलापूरमधून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू झाली पाहिजे. सोलापूरहून मुंबईला विमानसेवा कधी सुरू होणार, याची ग्यारंटी देऊनच मुरलीअण्णा तुम्ही इथून जायचे आहे, असा दमच पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आपल्या भाषणातून केंद्रीय मंत्र्यांना भरला.
आम्हाला केवळ मुंबईलाच नाही, तर तिरुपतीलाही जायचं आहे. त्यामुळे ही विमानसेवा आता सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे. आपण कधीतरी गुलर्ग्याला जात होतो, आता ते आपल्याकडे येतील. सोलापूरकरांच्या मनात जे आहे, ते सांगूनच आपण इथून जावं, अशी माझी आपल्याला विनंती आहे, अशी मागणीही पालकमंत्री गोरेंनी पुन्हा केली.
पालकमंत्र्यांच्या आग्रहानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-सोलापूर विमानसेवेची घोषणाच करून टाकली. ते म्हणाले, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-सोलापूर विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आता मला जाण्यासाठी परवानगी देतील. पण, सोलापूरच्या विमानसेवेसाठी पालकमंत्री गोरे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे तसेच लोकसभेच्या सभागृहात भेटल्यानंतर प्रणिती शिंदे याही विमानसेवेसाठी पाठपुरावा करायच्या. सर्वच नेते सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रयत्न करत होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले असून सोलापूर विमानसेवेने आता देशाशी जोडले गेले आहे.
आर्थिकदृष्टया परवडत नसल्याने सोलापूर ते मुंबई विमानसेवेसाठी एकही कंपनी पुढे येत नव्हती. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने ‘व्हीजीएफ’ देण्याचे कबूल केले आणि त्यामुळेच आज आपली सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर-मुंबई विमान सेवा सुरू होईल, असा विश्वास मोहोळ यांनी सोलापूरकरांना दिला.
मोदींची शपथ अन् सोलापूरची विमानसेवा
नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तसेच तिसऱ्या टर्ममधील मोदी सरकारला एक वर्षे पूर्ण झाले, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही विमानसेवा आज आपण सुरू करत आहोत, असेही मोहोळ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.