

Solapur, 05 January : दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शविणारे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांची नाराजी कायम असल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यातही दिसून आले. आमदार देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला दांडी मारून भाजपमधील घडामोडींबाबत आपली नाराजी कायम असल्याचे दाखवून दिले आहे. मेळाव्याकडे पाठ फिरविणाऱ्या सुभाष देशमुखांनी विमानतळावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या स्वागताला हजेरी लावली होती. या भेटीत त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवल्याची चर्चा रंगली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) हे नाराज आहेत. त्यानंतर भाजपमधील इनकमिंगबाबतही त्यांनी नाराजी दर्शविली होती. विशेषतः माजी आमदार माने यांच्या भाजप प्रवेशाला देशमुखांनी कडाडून विरोध केला होता. तसेच, प्रभाग क्रमांक २२ मधील पक्षांतराच्या घडामोडीबाबत त्यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली होती.
आमदार देशमुख यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना भाजपत आणून उमेदवारी दिली, त्यामुळे देशमुख हे कमालीचे नाराज झाले होते.
पालकमंत्री गोरे यांच्या कार्यशैलीमुळे आमदार विजयकुमार देशमुखही नाराज होते. त्यांच्या सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघात कोठे समर्थकांना पंधरा जागा सोडाव्यात असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचा निरोप गोरे यांनी दिला होता, त्याला देशमुखांनी विरोध दर्शविला होता. त्यातून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली होती. त्यामुळे भाजपमधील घडामोडींवर दोन्ही देशमुख हे नाराज होते.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तो मेळावा आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात होता, तरीही देशमुख यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे सुभाष देशमुख यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या मेळाव्या आमदार विजयकुमार देशमुखांनी मात्र हजेरी लावली होती. तसेच सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांची उपस्थिती हेाती.
मेळाव्याकडे पाठ फिरवलेल्या सुभाष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विमानतळावरच भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपली नाराजी प्रदेशाध्यक्षांना बोलून दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण तरी देशमुखांची नाराजी दूर करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
भेटीत राजकीय चर्चा झाली नाही : सुभाष देशमुख
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रथमच सोलापुरात आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विमानतळावर गेलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. दुसरे काम असल्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला जाऊ शकलो नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुभाष देशमुख यांनी मेळाव्यातील अनुपस्थितीबाबत दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.