
Solapur, 24 April : प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मनीषा मुसळे-माने हिला आणखी दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे निर्माण झालेले प्रश्न काही केल्या थांबयला तयार नाहीत. डोक्यात गोळ्या झाडून गेल्यानंतर डॉ. शिरीष वळसंगकरांना जवळच्या अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असलेल्या अश्विनी रुग्णालयात नेण्याऐवजी वळसंगकर हॉस्पिटल का नेण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे डॉ अश्विन वळसंगकरांनी दीड वर्षापूर्वी एका डॉक्टरांसंदर्भात घेतलेला निर्णय आपल्याच वडिलांबाबत का घेतला नाही, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येला उद्या शुक्रवारी (ता. २५ एप्रिल) आठ दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, संशयित म्हणून मनीषा मुसळे-माने हिला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यापुढे वेगवेगळ्या पातळ्यांवर चौकशी करण्यात येत आहे. मात्र, डॉक्टरांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णाला जवळच्या रुग्णालयात उपस्थित करणे. मात्र, डॉ. शिरीष यांच्याबाबत ते झालेले दिसत नाही, त्यामुळे अनेक शंका कुशंका वैद्यकीय शहरातील नामवंतांकडून उपस्थित केल्या जात आहेत.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळ्या झाडून घेतल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. थेट मेंदूवर आघात झाल्याने अनेक अवयव निकामी होत जातात, त्यामुळे त्या दृष्टीने उपचार व्हावेत, यासाठी वळसंगकरांना सुसज्ज अश्विनी रुग्णालयात नेणे आवश्यक होते. कारण, अश्विनी रुग्णालयातच (Ashwini Hospital) किडनी, फुफ्फुस, हृदय अशा अवयवांना सपोर्ट करणाऱ्या अत्याधुनिक मशीन्स उपलब्ध आहेत. निकामी अवयवांना जीवंत ठेवण्याची सर्व अत्याधुनिक मशिन अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे डॉ. वळसंगकरांना अश्विनीमध्ये नेणे आवश्यक मानले जात होते.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या वळसंगकर हॉस्पिटलमध्ये केवळ मेंदूविकारावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. याशिवाय व्हेंटीलेटरची सुविधा आहे, त्यामुळे डॉक्टरांना वळसंगकर हॉस्पिटलच्या ऐवजी अश्विनी रुग्णालयात नेणे आवश्यक होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या घरापासून दोन्ही रुग्णालये समान ६५० मीटर अंतरावर आहेत. अश्विनी रुग्णालयाकडे जाणारा रस्ता तुलनेने चांगला आणि प्रशस्त होता, त्यामुळे ‘गोल्डन अवर’वरमध्ये रुग्णांवर उपचार होणे आवश्यक मानले जाते, तोच नियम डॉ. वळसंगकर यांच्याबाबत पाळला गेला नाही, त्यामुळे संशयाला जागा निर्माण झाली आहे.
दरम्यान, सोलापुरातील एका प्रसिद्ध डॉक्टरांना दीड वर्षापूर्वी स्ट्रोक आला होता. त्या डॉक्टरांना वळसंगकर हॉस्पिटलमध्ये तातडीने ॲडमिट केले होते. त्यावेळी डॉ शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांनी त्या डॉक्टरांना ताबडतोब ‘आयव्ही’ लावून अश्विनी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला होता. तेथील उपचारानंतर संबंधित डॉक्टर बरे झाले. ताचे निर्णय डॉ अश्विन यांनी आपल्या वडिलांच्याबाबत का घेतला नाही, अशी चर्चा सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात दबक्या आवाजातून होत आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अनेकांची नावे चर्चेत येत आहेत. त्यातील काहींची भूमिका वळसंगकर यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये न नेण्याबाबत होती का, हा मुद्दा महत्वाचा आहे. डॉ. वळसंगकर यांना हॉस्पिटलमध्ये बेदखल करण्याचे काम ज्या नातेवाईकांकडून सुरू होते, त्यांचीही भूमिका यात काय होती का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.