
Solapur, 20 July : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे उद्या (ता. २१ जुलै) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर तटकरे हे प्रथमच सोलापुरात येत आहेत. गटबाजीचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्षांच्या समोर तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकी दिसणार की पक्षातील बेकीचेच पुन्हा दर्शन होणार?, असा सवाल चर्चिला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) ‘निर्धार नवपर्वा’च्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचा उद्देश या दौऱ्याचा आहे.
खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) ते उद्या दुपारी अडीच वाजता सोलापूर येथे येणार असून त्यांनी सोलापूरसाठी तीन तासांचा वेळ दिला आहे. सोलापूरच्या दौऱ्यात ते शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीशी संवाद साधणार आहेत. तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही बैठक तटकरे घेणार आहेत. या बैठकीनंतर तटकरे हे पत्रकार परिषदेत घेणार आहेत.
सोलापूर (Solapur) जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, या जिल्ह्यातून एकेकाळी सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून यायचे. मात्र, 2024 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आलेला नाही. हक्काच्या जागाही पक्षाला गमवाव्या लागल्या आहेत, त्या परवामागे पक्षातील गटबाजी हे प्रमुख कारण आहे.
मोहोळमध्ये खुद्द जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. या दोन्ही नेत्याचा एकाच पक्षात असूनही सवता सुभा आहे. या दोघांच्या वादात मोहोळ विधानसभेची हक्काची जागा पक्षाला गमावी लागली. त्यावर पक्षश्रेष्ठींनी अजूनही तोडगा काढल्याचे दिसून येत नाही. या दोघांनीही आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे.
दुसरीकडे, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या ऐवजी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे माढ्यातून अजित पवार यांनी माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांना घड्याळाच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत उतरावे लागले होते. मात्र, निवडणुकीपासून त्या पक्षापासून लांब आहेत. तसेच पक्षाकडूनही त्यांना तेवढीशी ताकद मिळताना दिसत नाही. ऐन विधानसभा निवडणुकीत साथ सोडूनही बबनराव शिंदे हे पुन्हा एकदा अजितदादांच्या जवळ असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी ही पक्ष म्हणून वाढणार की ठराविक व्यक्तीभोवतीच फिरणार, हा खरा प्रश्न आहे.
बबनराव शिंदे यांच्याप्रमाणे त्यांचे बंधू संजय शिंदे यांनीही करमाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याऐवजी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. ते अजूनपर्यंत तरी पक्षाच्या व्यासपीठावर दिसून आलेले नाहीत, त्यामुळे करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा संजय शिंदे यांच्यावरच अवलंबून राहणार की स्वतःची ताकद उभी करणार, हा खरा प्रश्न आहे.
सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यातही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सोलापूर शहरात आलेले उमेश पाटील यांच्या स्वागतालाही शहराध्यक्ष आणि टीम गेली नव्हती. आता माजी आमदार राजन पाटील यांनी सोलापूर शहरात लक्ष घालायला सुरुवात केली असून शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासोबत त्यांचे सूत जुळले आहेत, त्यामुळे सोलापूर शहराच्या माध्यमातून राजन पाटील यांनी उमेश पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.
मोहोळ, माढा, करमाळा हे हक्काचे मतदारसंघ सोडले तर इतर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ताकद किती हा खरा संशोधनाचा विषय आहे. अनेक महत्त्वाचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे प्रमुख चेहरे या उर्वरीत तालुक्यात किती आहेत, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.