

Pune senior social worker passes away : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव (वय 95) यांचं निधन झालंय. आज राञी 8:25 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुना हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबा आढाव यांनी वयाच्या 95 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रभाग, असंघटित कामगारांचा नेता, सत्यशोधक चळवळीचे नेते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य अशा विविध घटकांशी ते जोडले गेले होते.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजार होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. बाबा आढाव यांच्यावरील उपचारांची विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले. तेव्हाही शरद पवारांनी (Sharad Pawar) सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण करत आदरांजली वाहिली होती. तसंच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर त्यांच्या निधनाची माहिती देताना, आठवणींना उजाळा दिला.
1936 मध्ये पुण्यात (Pune) जन्मलेले बाबा आढाव हे पाच भावंडांतील धाकटे होते. आईचं निधनानंतर ते वडिलांच्या अनुपस्थितीत आजोळ्यात वाढले. विज्ञान शाखेत बी.एस्सी. पदवी आणि आयुर्वेदात पदवीधर होते. 1953 मध्ये घरातच दवाखाना सुरू करून त्यांनी गरीब रुग्णांना मोफत सेवा दिली.
बाबा आढावा यांची असंघटित कामगारांच्या नेते म्हणून ओळख होती. आढाव हमाल पंचायतीशी जोडलेले होते. 1962 ते 1971 पर्यंत पुणे महापालिकेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी झोपडीवासीयांसाठी ‘झोपडी संघा’ची स्थापन केली. 1952च्या अन्नधान्य भाववाढविरोधी सत्याग्रहापासून ते गोवामुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत ते अग्रभागी होते. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषदेची स्थापना करून धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला.
बाबा आढाव यांनी सत्यशोधक चळवळीत देखील सक्रिय होते. दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, अल्पसंख्याक, अपंग आणि कष्टकरी यांच्या हक्कांसाठी त्यांनी अथक संघर्ष केला. आणीबाणी काळात विद्यमान सरकारविरोधात प्रचंड मेळावे घेतला. यात त्यांना 16 महिन्यांचा कारावास भोगावा लागला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य म्हणून नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर होते. अंधश्रद्धाविरोधी लढ्यात त्यांनी अनेक ठिकाणी शिबिरात सहभागी होत मार्गदर्शन केलं. एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विषमता निर्मूलन समितीचे प्रमुख कार्य त्यांनी केले.
बाबा आढाव हे परिवर्तनवादी होते. त्यांनी यातूनच विविध परिवर्तनवादी संस्थांना एकत्र केलं. संसदबाहेरील कार्यकर्त्यांसाठी त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारला. महात्मा फुले यांची ‘सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार’ ही सुचिता त्यांनी जपली. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं. माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव यांनी म्हटलं होते.
'काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडामधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की, भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे,' असे म्हणत शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आढाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलन केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.