

Pune News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्करी असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी संपूर्ण जीवन वाहून घेणारे डॉ. बाबा आढाव यांचं सोमवारी (ता.8 डिसेंबर) दीर्घ आजारानं निधन झाले आहे. त्यांनी 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कष्टकऱ्याचा आणि श्रमिकांचा बुलंद आवाज ही त्यांची सर्वश्रुत ओळख होती.
गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राजकीयसह सर्वच स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात त्यांनी मोठा मुद्दा उपस्थित केला आहे.
पुण्यासह महाराष्ट्रभरातून समाजवादी नेते व मानवतावादी नेते आणि कष्टकरी, कामगारांचे कैवारी म्हणून ओळखले जाणाऱ्या बाबा आढाव (Baba Adhav) यांच्या निधनानं लढवय्या व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.याचदरम्यान,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या शैलीत बाबांच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा मांडताना आजच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात,ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकार्यांच मोहोळ तयार केलं.त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव. बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर.पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतल्याचंही राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणतात.
महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की,सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही.हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे,स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे, असं बोटही मनसे अध्यक्षांनी आजच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीवरुन ठेवलं आहे.
पुढे राज ठाकरे म्हणतात, असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान. बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे.
सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला 'गिग वर्कर' म्हणता येईल असे सगळेच असुरक्षिततेच्या गर्तेत सापडल्याची खंतही राज ठाकरे आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये व्यक्त करतात.
बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही,पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे,त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. याचवेळी त्यांनी बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.