MLC Election 2026 : "दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. 'आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत' पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही", अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला इशारा दिला आहे.
रामदास आठवले यांच्या पक्षाला विधान परिषदेत एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवलेंनी आपल्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केल्याचं दिसत आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन आपली खदखद व्यक्त केली आहे.
आठवलेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आपला RPI पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. 'आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत' पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही.
विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेलाच पाहिजे', असं म्हणत त्यांनी महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये आरपीआयला संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तर याच पोस्टमध्ये त्यांनी महायुतीमध्ये आपल्या पक्षाचं योगदान असल्याची आठवण देखील भाजप आणि शिवसेनेला करून दिली आहे. ते म्हणाले, 'ज्या काळात भाजप-शिवसेनेसोबत इतर कोणतेही नेते आणि पक्ष येत नव्हते, त्या कठीण काळात आपला RPI पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला.
भाजप-शिवसेनेच्या युतीसोबत जेव्हा आपली RPI ची ताकद जोडली गेली, तेव्हाच खऱ्या अर्थाने या युतीची 'महायुती' झाली आहे. आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून, आपला पक्ष देशभरात वेगाने वाढत आहे.
भविष्यात आपल्या पक्षाला कोणीही गृहीत धरू नये आणि सत्तेत आपला हक्क व सन्मान अबाधित राहावा, यासाठी आता RPI च्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने व नव्या जोमाने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे.', असा इशाराच आठवले यांनी भाजपला दिला आहे. त्यामुळे आता महामंडळात आठवलेंच्या पक्षाला काही स्थान दिलं जाणार का? आणि न दिल्यास ते काही वेगळी भूमिका घेणार का? याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.