भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणामुळे अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर येत असून त्यात रुपाली चाकणकर यांचाही समावेश असल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. हा निर्णय त्यांनी काल रात्री घेतला असून त्यानंतर या प्रकरणाची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, स्वत: दीपक केसरकर म्हणतात, मीच का ? 40 आमदार तिथे जात होते. सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत, मलाच टार्गेट करू नका. तिथे 40 आमदार, खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, आता हे 40 आमदार कोण?, तिथे जाणारे मंत्री कोण?, हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे.
संजय राऊत यांनी पुढे असेही म्हटले की, खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोकं होते?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे, खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते?, कोणाला भेटत होते?, हे सुद्धा पोलीस तपासात निष्पन्न झालं असेल, तर ते समोर यायला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली.
खरात यांचा प्रभाव इतका मोठा होता की ते राज्यातील विविध स्तरांवर सक्रिय होते. त्यांच्या वावराबाबत बोलताना राऊत यांनी उपरोधिक टीका करत सांगितले की, जणू काही त्यांना सरकारी मान्यता मिळाल्यासारखे वातावरण होते. त्यांना पाठिंबा देणारे काही लोक आजही सत्तेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.