
Mumbai News : खातेवाटप होऊन महिना उलटून गेल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण धनंजय मुंडेंना भोवले असल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडेंना बीडच नाहीतर अन्य कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कॊणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नसणार आहे.
बीड व पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांची निवड होण्यापूर्वी बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) देण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यामुळे बीडचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली होती. विशेष म्हणजे जालना जिल्ह्याचे पाल्कमंत्रीपद पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन मंत्री पालकमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. बीडमधील हत्याप्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणीही केली जात होती. तर आमदार धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार शनिवारी बीड व पुण्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला होता. दुसरीकडे आठ दिवसावर प्रजासत्ताकदिन आला असला तरी जिल्हा मुख्यालयात आता कोणाच्या हस्ते ध्वजवंदन होणार हा प्रश्न सतावत होता. काही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून वाटपावरून महायुतीच्या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत होती. त्यामुळे ज्या जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत वाद आहेत, त्यावर या बैठकीत तोडगा काढत शनिवारी पालकमंत्रिपदे जाहीर करण्यात आली.
महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच होती. विशेषतः राज्यातील रायगड, बीड, सातारा,जळगाव यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमधील तीन घटक पक्षामध्ये वाद आहे. सातारा जिल्ह्यात तब्बल चार मंत्री असून यात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांचा समावेश आहे.
त्यामुळे या चारही मंत्र्यांपैकी कोणाला पालकमंत्रिपद द्यायचे, यावरून रस्सीखेच सुरू होती. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. या तिघांमध्ये जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावर चुरस होती. रायगड जिल्ह्याच्या पाल्कमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.