
Santosh Deshmukh murder reason News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. त्यातच या प्रकरणात दररोज मोठं-मोठे खुलासे होत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात वेगाने घडामोडी घडत असतानाच खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडची बुधवारी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यातच बीड कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी संतोष देशमुख यांची हत्या का झाली? याचे सीआयडीने खरे कारण पहिल्यांदाच समोर आणले आहे.
सीआयडीने (CID) या प्रकरणाचा तपास करून संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का करण्यात आली? याचे खरे कारण बुधवारी कोर्टात सांगितले. अवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टात बुधवारी हजर करण्यात आले. यावेळी सीआयडीने कोर्टात जवळपास 9 महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यामध्ये वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली. पण कंपनीने दिली नाही. यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली, असा मोठा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा तपास करीत असताना नेमकी हत्या का झाली? ते आतापर्यंत स्पष्ट होत नव्हते. सुदर्शन घुले याला 6 डिसेंबरला मारहाण झाली होती त्याचा बदला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला आहे. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडथळा ठरत होते त्यामुळे आरोपींनी त्यांची कट रचून हत्या केली, असे सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीआयडी, एसआयटीने कोर्टात केला हा दावा
अवादा कंपनीकडे वारंवार खंडणी मागितली होती. पण अवादा कंपनीने दिली नाही. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी मिळाली नाही. त्यातच अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिले होते. यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला आहे.
कराडने धमकी दिल्याचे झाले उघड
दरम्यान, या प्रकरणात अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडने धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराडने थेट धमकी देत 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणात शिवाजी थोपटे यांना त्याच्या कार्यालयात बोलवून धमकी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात अवादाच्या अधिकाऱ्यांना कराडने धमकी दिल्याचे समोर आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.