
महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम आहे.या दोन्ही ठिकाणी डीपीडीसीच्या बैठकाही त्यामुळे होऊ शकलेल्या नाहीत. याचदरम्यान,आता एकनाथ शिंदे हे शुक्रवारी(ता.7)रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, शिवसेनेचे सहा खासदार जाणार, अशी बातमी पाहिली. पण आता तुम्ही पुढे पुढे करून दाखवा तुमचं डोकं फोडू.. तुमच्या सर्व यंत्रणा बाजूला ठेवा. पोलीस बाजूला ठेवा आणि मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखवा...इन्कम टॅक्स, ईडी ,सीबीआय अशी भीती दाखवायची, पैशाचे अमिष दाखवायचं असा हल्लाबोलही ठाकरेंनी यावेळी केला.
मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या असल्याची माहिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे.
लाडकी बहीण योजना आम्ही आणली आणि जाहीर केली. या योजनेचा लाभ २ लाख ५० हजार उत्पन्न असणाऱ्यांना द्यायचा होता. त्याचा लाभ अपात्र लोकांनी घेतला असला तरी त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडून परत घेण्यात येणार नाही. महिलांना कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
भंडारा जिल्हा परिषदमध्ये विषय समितीच्या चार सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात चारही सभापती हे ईश्वरचिठ्ठीनं निवडून आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदमध्ये 51 सदस्य असून सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेश पाटील हे गैरहजर राहिल्यानं 50 सदस्य सभागृहात बसले होते. काँग्रेसकडं 21 सदस्य आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 4 सदस्य फोडून जिल्हा परिषदवर सत्ता मिळविली. भाजपचा एक सदस्य सभागृहात नं पोहोचल्यानं संख्याबळ 25-25 असे होते. त्यामुळे ही निवडणूक ईश्वरचिठ्ठीनं पार पडली. यात काँग्रेसच्या एक तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन सभापती झाले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या धनंजय मुंडे विरोधात निवडणूक आयोगाला आज पत्र लिहिणार आहेत.ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि निवडणूक अर्ज भरतेवेळी माहिती लपवली असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि निवडणूक अर्ज भरताना माहिती लपवल्यामुळे आमदारकी रद्द करण्याची दमानिया यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. कालच घरगुती हिंसाचार प्रकरणी वांद्रे कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले होते.
जीबीएसची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुंबईमध्ये देखील जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की,जीबीएसवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवले आहे. आतापर्यन्त 6 रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात रुग्णांचे प्रमाण एकदम वाढे आहे .वेगवेगळ्या टीमला आपण कामं दिले होते. हॉटेल आणि पोल्ट्रीचे पाणी याबाबत तपासणी करण्यात आली येते. पाण्यासंदर्भात जबाबदारी कुणावर निश्चित करायची आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार, यासंदर्भात कायदा देखील केली जाणार असल्याचे आबिटकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वेल्हे पंचायत समितीसमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी 21 फेब्रुवारी 2025 च्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पीएसआय अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या केली आहे. अण्णा गुंजाळ हे पुणे शहरत पोलिस दलात कार्यरत होते. त्यांची नेमणूक खडकी पोलिस ठाण्यात होती. त्यांनीलोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुंजाळ हे बेपत्ता असल्याची तक्रार खडकी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यपक्षदी संजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती तात्पुरती आहे. पण सर्वाधिकार हे परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडेच असणार आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात यास्मीन वानखेडे यांनी वांद्रे कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरून वांद्रे कोर्टाने नवाब मलिक यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांनी केलेली वक्तव्ये, पोस्ट ही बदनामी करणारे आहेत, असे मत वांद्रे कोर्टाने नोंदविले आहे. आंबोली पोलिसांना वांद्रे कोर्टाने हे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्या भेटीचे कारण रोहित पाटील यांनी सांगितले आहे. मी मंत्रालयात निधी मागण्यासाठी त्यांना भेटलो होतो, मतदारसंघाच्या मागण्यासंदर्भात बैठक झाली आहे. मतदार संघातील मागणी घेऊनच अजितदादांकडे आलो होतो, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
जीबीएसचा अहिल्यानगर जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच जीबीएसचे चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हे चारही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर आज गंभीर आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधींनी आधी पराभवावर आत्मचिंतन करावे, असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे.
अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर केस बंद करण्याची मागणी त्याच्या आई-वडिलांनी मुंबई हायकोर्टात केली होती. मात्र, कोर्टाने या केसची सुनावणी यापुढेही सुरूच राहणार असल्याचे आज स्पष्ट केले. आई-वडिलांनी कोर्टात येण्याची गरज नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील आमदार उत्तम जानकर यांच्याकडून मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत त्याचा उल्लेख केला. तसेच या मतदारसंघात मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणीही त्यांनी केली. पक्षाचे ११ उमेदवार तुतारीच्या गोंधळामुळे पराभूत झाल्याचा दावाही त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी म्हणाले, 2019 ते 2024 दरम्यान महाराष्ट्रात 34 लाख नवीन मतदार कुठून आले
यादरम्यान राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी म्हणाले, "महाराष्ट्र निवडणुकीता अभ्यास आम्ही केला. यामध्ये आम्हाला अनेक अनियमितता आढळल्या आहेत. आम्ही मतदारांचा आणि मतदार यादीचा अभ्यास केला. आमच्या टीम काम करत आहेत आणि आम्हाला अनेक अनियमितता आढळल्या आहेत."
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पाच वर्षात 34 लाख मतदार वाढले. पाच महिन्यात वाढलेले मतदार कोण आहेत, असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
खासदार फुटणार हे कोणत्या आधारे बोलताय. आमची वज्रमुठ सर्व 9 खासदार एकत्र.
अरविंद सावंत सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड वाद चालू आहेत. लक्ष विचलित करण्यासाठी अफवा पसरवत आहेत. जाणीवपूर्वक बातम्या सुरु आहे. अरविंद सावंत यांच्या घरी पत्रकार परिषद सुरु आहे. ठाकरेंच्या खासदारांची पत्रकार परिषद
बजेट नंतर सर्वसामान्यांना अजून एक मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 5 वर्षानंतर भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील व्याजदरात पाच टक्के कपात करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.
प्रयागराजच्या महाकुंभात पुन्हा एकदा आग लागली आहे. सेक्टर-१८ मधील शंकराचार्य मार्गावर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात, त्यामुळे ठाकरे गटाचे नेते लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयोध्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त आणि माजी एमएलसी सदस्य कामेश्वर चौपाल यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, कामेश्वर यांचे दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) कामेश्वर चौपाल यांना पहिल्या कारसेवकाचा दर्जा दिला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बारामतीवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ते पंढरपूरकडे रवाना झाले. मनसे पदाधिकारी दिलीप धोत्रे यांनी पंढरपूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी होतील.
निवड मंडळाच्या गुणवत्ता यादीनुसार समुपदेशनाद्वारे भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी. तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक आहे. या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
राहुल गांधी आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. निवडणूक आयोगासह महाराष्ट्रातील अनेक देशातील विविध मुद्यांवर ते बोलतील, असे राऊत यांनी सांगितले.
अतिरेक्यांप्रमाणे भारतीयांना अमेरिकेने परत पाठवल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला. भारताची काय इज्जत आहे, अमेरिकेने दाखवून दिले. डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहे, त्यावेळी याबाबत विचारणा करणार आहे का?, असा सवाल केला.
महापारेषणचे विविध प्रकल्प तात्काळ मार्गी लावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करा. त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देत शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण जाहीर करणार आहे. आरबीआयची 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पतधोरण विषयक बैठक सुरु आहे. त्यामुळे बँकेकडून रेपो रेटमध्ये 0.25% कपात करून तो 6.25 केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर करत अनेक नेत्यांना पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे आजपासून नागपूरकरांना पाहता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात ऐतिहासिक वाघनखेही ठेवण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.