

Thane News : राज्यातील गेल्या दोन ते तीन वर्षांत पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यातून निवडून द्यावयाच्या राज्यातील जवळपास 17 विधान परिषदेच्या जागासाठी सोमवारी निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 18 जूनला मतदान होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता वेगवान घडामोडी घडत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच, ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा उमेदवारीवरून आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पाहता १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा नवा जिल्हा वेगळा करण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघाचे नाव 'ठाणे-पालघर' असे संयुक्त झाले, मात्र मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आणि मतदार तेच राहिले. या मतदारसंघात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भायंदर, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर आणि वसई-विरार अशा तब्बल ७ महानगरपालिका, अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि ठाणे-पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांचे निवडून आलेले सदस्य (लोकप्रतिनिधी) मतदान करतात. या मतदारसंघात अंदाजे १०३० मतदार असून महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगरसेवक हेच या निवडणुकीतील निर्णायक मतदार असणार आहेत.
हा मतदारसंघ एकसंध शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला राहिला आहे. याठिकाणचा इतिहासावर नजर टाकली तर गेल्या तीन-चार दशकांपासून येथे शिवसेनेचे (अविभाजित) एकहाती वर्चस्व राहिले आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड मिळवली होती.
2010 च्या दशकापर्यंत हा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या काळात नेहमी शिवसेनेच्या वाट्याला जायचा आणि शिवसेना येथे सहज बाजी मारायची. राष्ट्रवादी काँग्रेसने या भागात वसंत डावखरे ठाणे पदवीधर/इतर निवडणुका आणि गणेश नाईक यांच्या माध्यमातून अनेकदा आव्हाने उभी केली, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या विशिष्ट जागेवर शिवसेनेचे पारडे नेहमी जड राहिले आहे .
या मतदारसंघाच्या इतिहासातील सर्वात गाजलेली आणि प्रतिष्ठेची निवडणूक जून २०१६ मध्ये पार पडली. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसमधून आलेले रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ठाण्याचे बडे नेते आणि तत्कालीन ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांना रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत तब्बल १,०१८ मतदारांनी मतदान केले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत रवींद्र फाटक यांनी तब्बल ६०१ मते मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला, तर वसंत डावखरे यांना केवळ ३४० मतांवर समाधान मानावे लागले. या पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता.
रवींद्र फाटक यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर २०२२ रोजी संपला. त्यामुळे ही जागा अधिकृतपणे रिक्त झाली. त्यामुळे ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्षांतील संख्याबळाची लढत पुन्हा चर्चेत आली आहे. या मतदारसंघात भाजपकडे तब्बल ४४४ मतांचे संख्याबळ असून, शिंदे यांच्या शिवसेना आणि निलेश सांबरे गटाची मिळून ३४६ मते आहेत. त्यामुळे आकड्यांच्या गणितात भाजप स्पष्टपणे वरचढ ठरत असताना, शिवसेनेसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे मोठे आव्हान असणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच ही निवडणुक जाहीर झाल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्यासोबतच याठिकाणी बहुजन विकास आघाडीकडे ७१ मते असून हितेंद्र ठाकूर यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. काँग्रेसकडे ४७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २९ तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे १८ मते आहेत. याशिवाय मनसे, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रत्येकी ६, एमआयएम ५, कोनार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १, अपक्ष ९ मते असून ही मतेही निर्णायक ठरू शकतात.
ठाणे-पालघर मतदारसंघात जवळपास ३ वर्षे ११ महिन्यांनंतर ही निवडणुक होत आहे. निवडणुकांची घोषणा होताच ठाणे-पालघर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे तर त्याशिवाय नुकताच राष्ट्रवादीमधून सेनेत प्रवेश केलेल्या आनंद परांजपे यांचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे भाजपचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप उमेदवार रिंगणात उतरवू शकतो. मात्र, अद्याप भाजपकडून इच्छुकांचे नाव समोर आले नसले तरी या मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.