
Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृ्त्वाखालील एनडीए सरकारनं लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. बुधवारी मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान पार पडलं. यात या विधेयकाच्या बाजूनं 288 तर विरोधात 232 मतं पडली.
तर ऐनवेळी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं आपला पत्ता ओपन करत वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केलं. यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (ता.3) पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकेची तोफ डागली. ठाकरेंच्या याच टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोशल मीडियावर ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहेत. त्या ट्विटमध्ये बावनकुळे म्हणतात,अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात,एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाल्याचा टोलाही भाजपकडून लगावण्यात आला.
उद्धव ठाकरेंनी मीडियाशी संवाद साधताना संसदेत वक्फ दुरुस्त विधेयकावर बोलताना अमित शाहांनी जिनांना लाजवेल, इतकी मुस्लिमांची बाजू घेतली.तेव्हा भाजपनं हिंदुत्व सोडलं का? अशी बोचणारी टीका करतानाच ठाकरेंनी आमचा वक्फ विधेयकाला नाही, तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचीही भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली होती. त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या टीका भाजपला झोंबली होती. त्याचमुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही क्षणातच ठाकरेंना हल्लाबोल केला आहे.
बावनकुळे म्हणाले,संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय. अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रकार परिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे, असा चिमटाही बावनकुळेंनी ठाकरेंना काढला.
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरुन केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपची दुटप्पी भूमिका असून त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं म्हटलं होतं.
तसेच ही चर्चा करण्यासाठी 2 आणि 3 एप्रिल हे दिवस फक्त अमेरिकेने भारताला दिलेल्या असहकार्यावर पडदा टाकण्यासाठी भाजपने निवडले.अमेरिकेने तुम्ही जसे करता तसेच करत कर लादू असा इशारा दिला. यावरून दुर्लक्ष करण्यासाठीच भाजपने हा प्लॅन आखला आणि वक्फ विधेयक आणलं असा दावा ठाकरेंनी केला आहे. तर या टेरिफचा लोकांना विसर पडावा म्हणून आधी ईदच्या पार्ट्या झोडल्या आणि विधेयक आणल्याचा आरोप देखील ठाकरेंनी केली होता.
ईदच्या मेजवान्या झोडल्या आणि वक्फचं बिल मांडलं. आता ते मंजुरही करून घेतलं आहे.पण ज्यांनी वक्फचं बिल मांडलं ते किरण रिजेजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. हे कदाचित भाजपला माहित नसावं. की हा योगायोग म्हणावा, असा हल्लाबोलही ठाकरे यांनी यावेळी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.