
Jalna News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या तीन जणांनी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापवतानाच मोठा लढा उभारला होता. या लढ्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. तसेच अजितदादांनासुध्दा बीडचं पालकमंत्रिपद स्वत:कडं घ्यावं लागलं. कालच पालकमंत्री अजित पवारांनी बीडचा दौरा करुन 24 तास उलटत नाही, तोच मराठवाड्यातून आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी (ता.3) जालन्यात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवतानाच अंजली दमानिया यांनी सातत्यानं बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांची एक एक धक्कादायक प्रकरणं समोर आणली होती. याची दखल पोलिसांसह चौकशी यंत्रणांनाही घ्यावी लागली होती.
बीडमधील गुन्हेगारी चव्हाट्यावर आणण्यात अंजली दमनियांचा वाटा मोठा आहे.त्यांनी तेथील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवारांचीा भेट घेत बीडमधील दाहक व तितक्याच भयावह परिस्थितीचं वास्तव समोर ठेवलं होतं. त्याच अंजली दमानिया यांनी अचानकपणे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अंजली दमानिया यांनी मनोज जरांगेंची (Manoj Jarange Patil) भेट घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आम्ही आतापर्यंत कधीही भेटलो नव्हतो,फक्त फोनवर चर्चा झाली होती. म्हणून मी आज ठरवून भेटू घेतली. सगळ्याच चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो,असेही त्यांनी सांगितले. यावेळी तिथे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही उपस्थित होते.
अंजली दमानिया म्हणाल्या,दोन-तीन दिवसांपूर्वी एका सभेमध्ये मनोज जरांगेदादांना चक्कर आली होती. त्यावेळी मी ठरलं होतं की, आपण प्रत्यक्ष भेट घेऊन दादांच्या तब्येतीची विचारपूस करावी, त्याचमुळे त्यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत आले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची दिशा कशी असेल यावरही मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. मला पोलिसांनी दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये सगळंच अर्धवट वाटत असल्याचंही त्या म्हणाल्या.
आरोपी सुदर्शन घुलेचं स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आलं,ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण,त्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही याबाबत चकार शब्द सुद्धा स्टेटमेंटमध्ये लिहिला नसल्याचा धक्कादायक आरोपही दमानिया यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.