

उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक न लढता अंबादास दानवे यांना पुढे केले आहे.
काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेत हालचाली वेगात सुरू केल्या आहेत.
A फॉर्मसाठी हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार श्रीनिवास बिक्कड मुंबईकडे रवाना होत आहेत.
Mumbai News : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास राहिले असताना आता महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर न जाण्याचा निर्णय घेत आपल्या ऐवजी माजी आमदार अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले आहे. यामुळे आता काँग्रेस आक्रमक झाली असून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमदेवार देणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. तर काँग्रेसकडून पाच नावांची चर्चा सुरू झाली असून आता A फॉर्मबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे पक्षाने उमदेवार देण्याचे निश्चत केल्याचे आता बोलले जात आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election)
राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार असून येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. यात १ जागा ही पोटनिवडणुकीची आहे. तर ९ जागा या रिक्त होणाऱ्या जागांची आहे. या ९ जागांपैकी १ जागा मविआच्या वाट्याला आली आहे. आता या एकाच जागेवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे.
जर ठाकरे स्वत: विधानपरिषदेवर जाणार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ अशी घोषणा आधीच काँग्रेसने केली होती. तसेच जर असे झाले नाही तर या जागेवर काँग्रेस उमेदवार देईल असेही सांगितले होते. त्याप्रमाणे काँग्रेस उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष देवून होती. आता ठाकरेंच्या शिवसेनेनं अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावाची घोषणा केली आहे
ज्यानंतर काँग्रेसने देखील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमदेवार देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तातडीनं दिल्लीला गेले असून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर काँग्रेस विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षातर्फे A फॅार्म दिला गेला असून तो मुंबईत पाठवण्यात येणार आहे. याची जबाबदारी पक्षाने श्रीनिवास बिक्कड यांच्यावर दिली आहे. बिक्कड यांनी कांग्रेस मुख्यालयातून A फॅार्म घेतला असून ते मुंबईकडे आजच रवाना होणार आहेत. यामुळे काँग्रेसकडून आज रात्रीच नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान आता काँग्रेसकडून विधान परिषदेच्या उमेदवारी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून काही नेत्यांची नावे देखील आता समोर येत आहेत. यात बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच काँग्रेसच्या हायकमांड यांच्याकडून देखील पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.
1. उद्धव ठाकरे यांनी कोणता निर्णय घेतला आहे?
त्यांनी विधान परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
2. त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे?
अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
3. काँग्रेसची भूमिका काय आहे?
काँग्रेस स्वतःचा उमेदवार देण्याच्या तयारीत असून हालचाली सुरू आहेत.
4. A फॉर्म म्हणजे काय?
A फॉर्म हा पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यासाठी वापरला जाणारा दस्तऐवज आहे.
5. श्रीनिवास बिक्कड का चर्चेत आहेत?
ते A फॉर्म घेऊन मुंबईत येणार असल्यामुळे उमेदवारी प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.