

Ahilyanagar development issue : अहिल्यानगर महापालिकेने “अर्बन चॅलेंज फंड” अंतर्गत तब्बल 538 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. पाणी योजनेसाठी त्यात 375 कोटींच्या कर्जाचा घाट घातला जात आहे.
तब्बल 1000 कोटींच्या कर्जाचा घाट म्हणजे अहिल्यानगर शहराला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा सत्ताधाऱ्यांचा धोकादायक डाव आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असून, देखील त्यांना अनुदान आणता येत नाही. म्हणून शहराला कर्जबाजारी करण्याचा उद्योग सुरू आहे, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केला आहे.
मनपाकडे साधे पगाराचे, विज बिल भरण्याचे पैसे नाहीत. आज 'पे अँड पार्क'ची लूट सुरू आहे. उद्या तर हे नगरकरांच्या प्रत्येक श्वासावर कर लावतील. महापालिकेच्या कर्ज घेण्याच्या योजनेला शिवसेना (ShivsenaUBT) ठाकरे सेनेने कडाडून जाहीर विरोध केला आहे. 1000 कोटींच्या कर्जातून टेंडरच्या माध्यमातून ठेकेदार, सत्ताधारी, राजकीय पदाधिकारी श्रीमंत होतील. पण शहर कायमचे रसातळाला जाईल, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली आहे.
किरण काळे म्हणाले, "पाणी व भुयारी गटर योजनेच्या नावाखाली महापालिकेवर (Municipal) प्रचंड आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार सुरू असून महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता हे नियोजन पूर्णपणे आत्मघातकी आहे. आज वीज बिल, कर्मचारी पगारासाठी आर्थिक खळखळाट सुरू आहे." मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली कोलमडलेली आहे. निधी अभावी रस्त्यांची कामं रखडली आहेत. अशा परिस्थितीत जागतिक बँक व अन्य वित्तीय संस्थांकडून सुमारे 1000 कोटी रुपयांचे कर्ज घेणे म्हणजे शहराच्या भवितव्याशी खेळ करण्या सारखे असल्याचा गंभीर, आरोपही किरण काळेंनी केला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी सावेडी, फेज-टू अमृत योजनेवर यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे उपसा करण्याची क्षमता वाढली आहे. सुमारे पाच लाख लोकसंख्येसाठी पाणी वितरण करून देखील यातून पाणी उरेल एवढी क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात नगरकरांना आजही दिवसा आड, तर काही भागांत तीन-चार दिवसांनी, तेही कमी दाबाने पाणी वितरित केले जाते. काही भागात तर आजही टँकर सुरू आहेत.
असे असताना 495 कोटींची नवी पाणी योजना करणे म्हणजे जुन्या योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश झाकण्यासाठीचा हा घाट असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. आजही सावेडी, बोल्हेगावसह अनेक भागांमध्ये भुयारी गटारी योजना राबविणे बाकी आहे. या कामासाठी प्राधान्य द्यावे, असे काळे यांनी म्हटले आहे. मात्र त्यासाठी कर्ज नव्हे तर आपले राजकीय वजन वापरून शंभर टक्के अनुदान सत्ताधाऱ्यांनी आणून दाखवावे, असे आव्हान काळे यांनी दिले आहे.
मनपा निवडणूक प्रचार सभे वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर पाणी योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीने नगरोत्थान योजनेतून सुमारे 495 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र देवाभाऊंच्या घोषणेतील एक छदामही शहराला मिळालेला नाही. आश्वासनांना भुलून नगरकरांनी सत्ताधाऱ्यांना मनपात एका हाती सत्ता दिली. सत्ताधाऱ्यांकडे पाशवी बहुमत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता आहे. मग राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान आणण्याऐवजी जनतेच्या माथी कर्जाचा डोंगर का लादला जात आहे? असा सवालही किरण काळे यांनी उपस्थित केला.
अहिल्यानगर शहरात “पे अँड पार्क”च्या नावाखाली सुरू असलेली अक्षरशः लूट नागरिक अनुभवत आहेत. व्यापारांसह सामान्य नगरकरांचा देखील याला कडाडून विरोध आहे. उद्या शेकडो कोटींचे कर्ज फेडण्यासाठी याच पद्धतीने मनपाच्या नावाखाली वेगवेगळे कर, शुल्क, दंड आणि वसुली लादून राजकीय गुंड आणि ठेकेदारांच्या टोळ्या नागरिकांचे जगणे असह्य करतील, असा इशारा किरण काळे यांनी दिला. विकासाच्या नावाखाली सुरू असलेले आर्थिक षडयंत्र शहराची आर्थिक घडी कायमची कोलमडून टाकू शकते, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.