
Maharashtra Flood News : राज्याला सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. लाखो हेक्टरवर शेत जमीन वाहून गेल्या. घरांची पडझड, काहींचा मृत्यू झाला. आता अतिवृष्टीग्रस्त भागात साथ आजारांचा धोका उद्भवला आहे. यातच दिवाळी तोंडावर असताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, मदतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा, अशी मागणी करत, विरोधकांनी काल राज्यभरात सरकारच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी केली.
राज्यातील भाजप महायुती सरकारने विरोधकांच्या काळी दिवाळीला, अतिवृष्टग्रस्त शेतकर्यांना आज धनत्रयोदशीचा मुहुर्तावर 3 हजार 258 कोटी 56 लाख 47 हजार रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केलं आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्याला 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
राज्यातील महायुती सरकारने सप्टेंबरमधील अतिवृष्टीग्रस्तांच्या (Flood) मदतीसाठी 3 हजार 258 कोटी 56 लाख 47 हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. लाभार्थ्यांना मदत मिळाल्यानंतर त्यांची यादी, जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने अहिल्यानगमधील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना (Farmer) एकूण 846 कोटी 96 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 6 लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 3 हजार 258 कोटी 56 लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास 846 कोटी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
मदतीचा निधी वितरित करताना सरकारच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विरोधकांनी काळ राज्यभरात जिल्हा प्रशासनासमोर राज्य सरकारच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी करता, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. महाविकास आघाडीतील मित्रपक्षासह डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या सर्व संघटनांनी राज्यभरात काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध केला. याला भाजप महायुती सरकारने धनत्रयोदशीचा मुहुर्त साधत, मदतीचे पॅकेज वितरीत करून प्रत्युत्तर दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.