

Ahilyanagar political news : अहिल्यानगर महापालिकेची आजची महासभा सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने तहकूब करण्याची नामुष्की आली. कर्ज प्रकरणाच्या प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांमध्येच बिनसल्याने ही सभा तहकूब झाल्याची जोरदार चर्चा आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या इतिहासात, अशी सभा तहकूब होण्याची पहिलीच वेळ आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळेच सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे विरोधी नगरसेवकांनी म्हणत चर्चेला अधिकच हवा दिली आहे. या सभेपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून कर्ज प्रस्तावाला कडाडून विरोध करताना जोरदार विरोध दर्शवला होता.
अहिल्यानगर (Ahilyanagar) महापालिकेने 114.69 कोटींच्या पाच व्यापारी संकुल प्रकल्पांसाठी तब्बल 86.26 कोटी कर्जातून उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे स्वतःच्या उत्पन्नाचे ठोस नियोजन नाही, ती आता कोट्यवधींचे कर्ज घेणार असल्याचे या सभेकडे नगरकरांचे लक्ष लागलं होतं.
नेहरू मार्केट, सर्जेपुरा रंगभवन, प्रोफेसर कॉलनी चौक, जुने एनसीसी कार्यालय आणि गंज बाजार इथल्या व्यापारी संकुलांसाठी जवळपास 86.26 कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव होता. 15 मे रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर हे विषय ठेवण्यात आले आहेत. मात्र हे होण्यापूर्वीच 13 मे रोजी महापालिकेने (Municipal) बँकांकडून प्रस्ताव मागणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या आहेत.
दरम्यान, नेहरू मार्केट प्रकल्पासाठी स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले गेले. तसे गेल्या आठवड्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा मेगा इव्हेंट झाला. तिथं चितळे रोडवर फिरत 'झालमुड़ी' घेत, पालकमंत्री विखे पाटलांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
टंचाई व मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील आज जिल्हाधिकारी कार्यालयात होते. याचवेळी महापालिकेची महासभा होणार होती. परंतु 73 पैकी फक्त पाच नगरसेवक वगळता कुणीही सभेकडे फिरकले नाही. ही सभा तहकूब होण्यामागे पडद्याआड मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याच्या चर्चांना तोंड फुटलं आहे.
सत्ताधारी नगरसेवकांकडून गुळणी धरण्यात आली आहे. संपर्क साधूनही काहींनी बोलण्यास नकार दिला आहे. काहींनी फक्त सभेला येऊ नका, असे निरोप आल्याचे सांगत आहे. हे निरोप वरिष्ठ नेत्यांचे होते, असे देखील काहींनी सांगितले. पण वरिष्ठ नेते कोण हे नाव मात्र सांगितलं नाही. त्यामुळे सभा तहकूब होण्यामागे मोठी राजकीय खलबते झाले अन् एकच फायनल निरोप नगरसेवकांपर्यंत पोहोचला, अशी चर्चा आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून ही सभा तहकूब होण्यामागील कारण सांगण्यासाठी कुणीही पुढे न आल्याने चर्चांनी अधिकच तोंड फुटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.