

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला चक्क भोपळा (एकही जागा मिळाली नाही) मिळाला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली 'मविआ'कडून शरद पवार यांची राष्ट्रवादी तब्बल 29 जागांवर लढत होती.
पण एकाही जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खातं खोलता आलं नाही. तुलनेत भाजपचं नेतृत्व करणारे, माजी खासदार सुजय विखे पाटील भारी ठरले आहे. भाजपला 32 जागांवर लढवत असताना, त्यातील तीन जागा बिनविरोध आणि 25 जागा निवडून आणण्यात यश आलं आहे. यामुळे आगामी काळात, अहिल्यानगर शहरातून विखे पाटील अन् लंके यांच्यातील राजकीय संघर्ष वेगळ्या वळणार असेल, अशी चिन्हं आहेत.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) 'मविआ'चे अहिल्यानगर महापालिकेत नेतृत्व करत होते. अनेक गोष्टींवर ते स्वतः निर्णय घेत होते. काही ठिकाणी निर्णय फिस्कटले. 'मविआ'मध्ये असलेले अनेक मित्रपक्ष नाराज झाले. तरी ही नाराजी बाहेर पडू देता, पक्षासाठी काम करत राहिले. परंतु ग्राऊंड पातळीवर नेतृत्वाचं उमेदवारांना, कार्यकर्त्यांना बळ पाहिजे ते मिळालं नाही, त्याचा परिणाम थेट पक्षाला अन् 'मविआ'ला बसला असे आता उघडपणे कार्यकर्ते बोलू लागले आहे.
काही ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) उमेदवारांना खासदारकीला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून बोटचेपी भूमिका घेतली गेली. त्याचाही 'मविआ'अंतर्गत रोष होता. 'मविआ'च्या विशेष करून, शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर धमकावण्याच्या प्रकारांना रोखण्यात देखील उशिर झाला. याचाही फटका बसला. मित्रपक्षांबरोबर अन् विरोधकांना बिझी ठेवण्यात देखील नीलेश लंके कमी पडले.
तुलनेत सुजय विखे पाटलांनी प्रचारासह निवडणूक जिंकण्यासाठी पाहिजे असलेल्या सर्व नितींचा वापर करत यश खेचून आणलं. त्यांच्या या यशाला आमदार संग्राम जगताप यांची देखील मोलाची साथ मिळाली. 'मविआ'मधील काँग्रेसने 2 व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने 1 जागा जिंकून मिणमिणते यश मिळवले. अर्थात या तीन जागांचे यशही पक्षीय यशापेक्षा संबंधित यशस्वी उमेदवारांच्या स्वकर्तृत्वाचे अधिक आहे.
भाजपचे यश पाहिल्यास, त्यात सुजय विखे पाटलांचे बेरजेच्या राजकारणाची छाप दिसते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पॅनल साधून, नव्या-जुन्यांची सांगड घालून, हे यश खेचून आणल्याचे दिसते. तुलनेत खासदार नीलेश लंके यांची कामगिरी शून्यावरच थांबली. ही कामगिरी पुढील राजकीय वाटचालीसाठी खासदार लंकेंना चिंताजनक, अशी ठरू शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत 18 जागा जिंकल्या होत्या. यंदा 27 जिंकून 9 जागांची वाढ मिळवली. भाजपने मागच्यावेळी 14 जिंकल्या होत्या, यावेळी 11 जागांची वाढ मिळवत आपली संख्या 25पर्यंत नेली. या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. मागच्यावेळी एकत्रित शिवसेनेला 24 जागा होत्या.
यावेळी फुटलेल्या शिवसेनांपैकी एकनाथ शिंदे सेनेला 10 व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला 1 जागा मिळाली. दोन्ही सेना मिळून नुकसान 13 जागांचे झाले. काँग्रेसला मागच्यावेळी 5 जागा असताना यंदा अवघी 1 मिळाल्याने त्यांचे 4 जागांचे नुकसान झाले. बहुजन समाज पक्षाच्या मागच्या चार जागांच्या तुलनेत यावेळी अवघी 1 जागा मिळाल्याने त्यांचे तीन जागांचे नुकसान झाले. समाजवादी व अपक्ष यावेळी एकही आले नाही तर अहिल्यानगर मनपात पहिल्यांदाच AIMIMची दोन जागा जिंकून एन्ट्री झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.