Nashik PWD News: अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी दिल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच आहे. त्याला कंटाळलेल्या कळवणच्या कंत्राटदारांनी थेट आत्मदहनाचा इशाराच दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे वारंवार सांगतात. मात्र नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून शासकीय कंत्राटदार रस्त्यावर उतरले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन त्यांना सामोरे जाण्यासाठी कचरत आहेत. त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कंत्राटदारांची एक हजार कोटीहून अधिक बिले थकली आहेत. कळवण येथील आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाची बिले देखील मोठ्या प्रमाणात थकली आहे. सुरुवातीला अवघी पाच टक्के रक्कम शासनाने दिली. प्रशासन याबाबत कोणतीही हमी आणि माहिती देण्यास तयार नाही. त्यामुळे जिल्हाभर शासकीय कंत्राटदाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे.
कळवण येथील आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची बिले थकल्याने ते हातघाईला आले आहेत. या कंत्राटदारांनी सत्ताधारी आमदार नितीन पवार यांना गाठले. कंत्राटदाराची बिले न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर आमदार नितीन पवार यांसह पोलीस निरीक्षक फगेंद्र टेंभेकर, कार्यकारी अभियंता उमेश पाटील या सगळ्यांचीच धावपळ उडाली.
कंत्राटदाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून काहीही पैसे मिळाले नाही. त्यामुळे ते प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र त्यांच्या 'अपेक्षा'सोडायला तयार नाहीत. अनामत रक्कम परत करण्याचा शासकीय आदेश प्राप्त झाला आहे. मात्र प्रशासन त्याबाबत देखील कंत्राटदारांची कोंडी करीत असल्याने संताप व्यक्त झाला.
यातून या कंत्राटदारांनी थेट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या इशारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांनी दिवस-रात्र एक करून या कंत्राटदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील वरिष्ठ कार्यालयांना थकीत बिलांबाबत माहिती कळवली. या सगळ्या धावपळीनंतर कंत्राटदारांची समजूत घालण्यात प्रशासनाला यश आले.
कंत्राटदार संघटनेचे नेते रमेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मजूर संघाचे संचालक रोहित पगार, अजय पगार, विजय गुंजाळ, नरेंद्र वालखडे, धीरेद्र पगार, प्रतीक गुंजाळ, निलेश वाघ अशा शेकडो अभियंतांनी आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करीत घोषणा दिल्या. दोन वर्षांपासून बिले पेंडिंग असताना खड्डे बुजविण्याची सक्ती करणाऱ्या प्रशासनाचा देखील निषेध करण्यात आला.
सगळी सोंगे करता येतात, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. अर्थमंत्री अजित पवार याबाबत सत्तेचा दबाव आणून कंत्राटदारांचे तोंड बंद करीत आहेत. बिले थकीत असताना कंत्राटदारांना विविध प्रकारे आणि प्रशासनाच्या माध्यमातून धमकावली जात आहे. मात्र याने स्थिती अधिकच चिघळण्याची भीती आता निर्माण झाली आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.