
Nashik News: भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित संघटना मराठी माणसाची थट्टा करीत आहेत. यामध्ये मुंबई आणि मराठी भाषा यांच्याविरुद्ध मोठे कारस्थान असावे. त्यामुळेच राज्य सरकार भैय्याजी जोशी यांचा बचाव करीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नुकतेच मुंबईत वादग्रस्त विधान केले. मराठी भाषेविषयी त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विविध संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिंडोरीत जोरदार आंदोलन केले.
या संदर्भात पक्षाचे नेते डॉ. विलास देशमुख, सतीश देशमुख, पांडुरंग गनोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रामराव पवार यांना निवेदन देण्यात आले. कार्यकर्त्यांनी भैय्याजी जोशी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत वातावरण निर्माण केले.
यावेळी डॉ. विलास देशमुख यांनी भाजप (BJP) आणि राज्य सरकारवर गंभीर टीका केली. ते म्हणाले, राज्यातील मराठी माणसांनी तीव्र संघर्ष करून मुंबई महाराष्ट्रात ठेवली आहे. त्यासाठी 106 जण हुतात्मे झाले आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रदेश आहे. एवढे साधे ज्ञान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते म्हणवणाऱ्या जोशी यांना नसेल, असे म्हणता येणार नाही. भैय्याजी जोशी यांनी अतिशय जाणीवपूर्वक मराठी आणि अमराठी यांच्यात ध्रुवीकरण करण्याचे कारस्थान म्हणून हे विधान केले आहे.
एवढे गंभीर विधान केल्यानंतर देखील मुख्यमंत्री फडणवीस त्यांना वाचवत आहेत. फडणवीस ज्या प्रकारे त्यांची बाजू घेतात त्यानुसार भाजप आणि त्यांच्या संघटनांचे मराठी माणसाविरुद्ध मोठे कारस्थान दिसत आहे. सध्याचे सरकार राज्यात आल्यानंतर अनेक निर्णय मराठी माणसांच्या विरोधात झाले आहेत. महाराष्ट्रातील असंख्य महत्त्वाची सरकारी कार्यालय शेजारच्या राज्यात नेली आहेत. अनेक उद्योग गुजरातला पाठवले आहेत. यावरून त्यांना महाराष्ट्राच्या हिताची किती काळजी आहे हे स्पष्ट होते.
शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा मराठी माणसाविरुद्ध होणारा अपमान कधीही सहन करणार नाही. राज्य शासनाने तातडीने जोशी यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिवसेना ठाकरे पक्ष आपल्या स्टाईलने आंदोलन करीत राज्य सरकारला धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.