Nashik News : जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला भाव नाही, मशागतीसाठी डिझेल नाही मात्र भाजप आणि सत्ताधारी विधान परिषदेच्या निवडणुकीत मस्त आहेत. सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे नेते सध्या केवळ विधानपरिषद निवडणुकीचीच चर्चा करीत आहेत. निवडणुका जिंकण्याचे व्यसन त्यांना लागले आहे. निवडणुकीच्या नशेतून नाशिकचे शेतकरी या सत्याधाऱ्यांना जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी दिला.
नाशिक जिल्ह्यात कांद्याला मातीमोल भाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कांदा खरेदीची घोषणा दहा दिवसांपूर्वी केली. प्रत्यक्षात मात्र त्याची कुठेही कारवाई होताना दिसत नाही. यामध्ये नाफेड संस्थेची मोठी जबाबदारी असूनही ते काहीच करीत नाहीत. राज्य शासनाचे प्रशासन यावर काहीही उपायोजना करायला तयार नाहीत, असा आरोप यावेळी खासदार भगरे यांनी राज्य सरकारवर केला.
भाजपचे (BJP) केंद्र सरकार आणि त्यांच्या नाफेडसह विविध यंत्रणाचे याकडे दुर्लख होत आहे. या सर्व प्रकाराकडे डोळे बंद करून बसले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार कोण? या पार्श्वभूमीवर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
सध्या कांद्याला भाव नाही. खरिपाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे. सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) व पक्षाचे सर्व नेते आणि आमदार मात्र फक्त निवडणुका कशा जिंकायच्या यातच व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.
शेतकरी आणि जनतेशी त्यांना बांधीलकी आहे की नाही? असा प्रश्न पडतो. या पार्श्वभूमीवर येत्या 26 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारणार आहे, असा इशारा खासदार भगरे यांनी दिला. त्यामुळे कांदा प्रश्नावर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.