BJP Tribal News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आदिवासी मतदारसंघांमध्ये मोठा धक्का बसला आहे. याची पुनरावृत्ती विधानसभेत होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे भाजपची संघटनात्मक यंत्रणा खडबडून आता जागी झाली आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील आदिवासी मतदारसंघांमध्ये विशेष लक्ष घातले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत नुकतीच आदिवासी आदिवासी विकासमंत्री आणि पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यामध्ये तातडीने आदिवासी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय प्रभावासाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
शासकीय स्तरावर देखील यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. मात्र भाजपचे हे प्रयत्न यशस्वी होतील का? अशी गंभीर चर्चा आदिवासी कार्यकर्त्यांमध्ये आहे. या संदर्भात आदिवासी बांधवांच्या विविध संघटना भाजप आणि त्यांच्या मातृसंस्थेच्या राजकीय धोरणामुळे प्रचंड नाराज आहे. याची जाणीव अद्यापही भाजपला झालेली नाही. त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याची चर्चा आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल यांनी भाजपच्या धोरणावर गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.
यापूर्वी पाच वर्ष आदिवासी बांधवांनी भाजपला आपले मानले होते. मात्र भाजप सरकार आणि भाजपच्या मातृसंस्थेने आदिवासी बाबत घेतलेली धोरणे या समाज घटकांत तीव्र रोष निर्माण होण्यास कारणीभूत ठरली आहे,असा दावा केला. प्राचार्य बागुल म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीत प्रत्येक आदिवासी मतदारसंघात जाऊन भाजपला मतदान करू नये यासाठी काम केले. देशभर हीच भूमिका आदिवासी कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे देशातील भाजपचे 27 खासदार पराभूत झाले.त्यांची केंद्रातील सत्ता जाता जाता राहिली.
भाजपने (BJP) आदिवासींवर जाणीवपूर्वक अन्याय करण्याचे धोरण ठेवले आहेत, अशी टीका प्राचार्य बागुल यांनी केली. ते म्हणाले,मणिपूर मध्ये आदिवासी बांधवांवर प्रचंड अत्याचार झाले. भाजपने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना अटक करण्यात आली. भाजपने धर्मांतरित आदिवासींना शासनाच्या योजनांपासून दूर ठेवण्याचा अजेंडा ठरवला. देशभर आदिवासी डीलिस्टिंग आंदोलन केले. त्याचा या समाजात मोठा संताप आहे.
आदिवासींच्या आरक्षण राहणार की जाणार, अशी स्थिती भाजप नेत्यांचा वक्तव्यांमुळे निर्माण झाकेली आहे. बोगस आदिवासी मोठ्या प्रमाणात तयार झाले. आहेत. त्यावर सरकार म्हणून भाजपने भूमिका घेतलेली नाही. या सर्वांमुळे आदिवासींमधील युवा वर्ग प्रचंड अस्वस्थ आहे. त्याचा फटका निवडणुकीत भाजपला बसला.आगामी काळातही आदिवासी भाजप पासून दूर गेले आहेत. ते भाजपला मतदान करतील की नाही हे सांगता येत नाही. आदिवासींना जवळ करायचे असेल तर भाजप आणि त्यांच्या मातृसंस्थेला आपले धोरण बदलावे लागेल. त्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सध्या आदिवासींबाबत भाजपची भूमिका 'जखम डोक्याला आणि मलम पायाला'अशी आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.