
Sangamner water issue :संगमनेर तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न पेटला असून, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, या दोघांमध्ये एकमेकांविरोधात टीकेचे जोरदार प्रहार झाले.
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी मिळवण्यासाठी संगमनेरमधील शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांवर प्रशासनाने पोलिसी यंत्रणा लावून पाईप काढल्याने मोठा वाद निर्माण झाला. शेतकरी रस्त्यावर उतरला असून, 'आम्हाला आधी गोळ्या घाला, मगच पाणी घेऊन जा', अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. निमगाव बुद्रुक (ता.संगमनेर) येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपला तालुका, विविध सहकारी संस्थांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जातीधर्माच्या नावाखाली खोट्या भुलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले. तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर, तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे संकेत दिले होते.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) निळवंडे कालव्यात थेट पाईप टाकून पाणी घेतले. परंतु दोन दिवसांपूर्वीच हे पाईप फोडून टाकले. त्यानंतर भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन करत लेखी आश्वासन मिळवले. मात्र आश्वासनानंतर अवघ्या दोन दिवसांतच जलसंपदा विभागाने आपली भूमिका पलटवली आणि पोलिस बंदोबस्तासह पाईप काढण्याची मोहीम पुन्हा सुरु केली. यात काही पाईप जाणिवपूर्वक फोडण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला. त्यामुळे पुन्हा संघर्ष पेटला.
‘‘निळवंडे धरण आणि कालव्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जनतेने पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांचे पुनर्वसन करून घेतले. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक आणि कायदेशीर हक्क या पाण्यावर आहे. तरीदेखील त्यांच्यावर अन्याय होत असल्याने, हा प्रकार नेमका कोणाच्या सांगण्यावरून केला जातोय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अर्थात, थोरातांचा बोलण्याचा कल भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होता. दरम्यान निमगाव बुद्रुकसह तालुक्यातील अनेक गावांतून शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत असून, परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी प्रशासनाने राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवली आहे.
आंदोलनात संतापलेल्या शेतकऱ्यांनी जलसमाधीची भाषा करताना, 'राहुरी तालुक्यात 16 किलोमीटर कालव्याच्या क्षेत्राला वीस दिवस पाणी देता, तर संगमनेरमध्ये 48 किलोमीटर क्षेत्र असूनही त्याला साठ दिवस पाणी देणार का? आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी घेऊन जा! आमच्या जमिनी गेल्या, आम्ही भूमिहीन झालो. 400 रुपये गुंठ्याने जमिनी घेतल्या. हे पाणी आमच्या हक्काचे आहे. प्रशासनाने जबरदस्ती केली तर गप्प बसणार नाही. हक्काचे पाणी हिशेबाने मिळालेच पाहिजे', अशी आक्रमक भूमिका मांडली.
दरम्यान, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील सर्व प्रकारावर भूमिका मांडताना, जलसंपदा विभागाने जुन्या ब्रिटिशकालीन सिंचन योजना सक्षम करण्याचे धोरण स्वीकारले असून, लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचवणे हेच आमचे ध्येय असल्याचे सांगितले. मात्र, जनतेने नाकारलेल्या काही लोकांकडून स्वतः चे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण आणि दांडगाई सुरू असून, कोणीही शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता दिला.
भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा उजव्या व डाव्या कालव्यावरील वॉटर कोर्स व वितरिकांच्या नूतनीकरणाचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाला. निळवंडेचे आवर्तन सुरळीत सुरू असताना काही ठिकाणी अडथळे निर्माण केले जात आहेत. सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. फक्त आपल्यालाच पाणी मिळावे, दुसऱ्यांना नाही, ही भूमिका चुकीची आहे, असाही टोला मंत्री विखे पाटलांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.