AhmedNagar Political News : अवघ्या एका जागेवरुन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने थेट 13 जागांपर्यंत मजल मारली.याचाच परिणाम म्हणजे महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करू लागली.
ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपलं म्हणणं खरं करणार आणि काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाने एकीकडे 288 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान, आता नगरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेत त्यांना पत्र दिलं आहे.
महत्त्वाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची टेन्शन वाढवणारी बाब म्हणजे या पत्रातून जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यातील सात जागांवरती निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. यात सध्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या ताब्यात असलेल्या नगर शहर मतदारसंघाचाही समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीची गाडी सुसाट आहे.आघाडीतील नेतेमंडळीचा रुखही बदलला आहे. जिल्ह्यातील नगर व शिर्डी असे दोन मतदारसंघ महायुतीतील मातब्बर नेत्यांचा पराभव करत खेचून आणल्यामुळे आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे.
काँग्रेस पक्षाचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मुंबई गाठत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी पटोले आणि थोरात यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीविषयी चर्चा केल्याची माहिती आहे.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील 12 पैकी 7 जागा काँग्रेसपक्षाने लढवाव्यात अशा मागणीचे पत्र त्यांनी पटोलेंना दिले आहे.यामुळे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सध्याचं राजकीय गणित बघता नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या शिर्डी आणि नगर अशा दोन जागा आहेत. त्यात शिर्डी शिवसेना ठाकरे गट तर नगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे आहे.तसेच विधानसभेचे 12 मतदारसंघ असून त्यात संगमनेर,श्रीरामपूर हे दोनच मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी पटोले- थोरातांच्या भेटीत श्रीगोंदा, नगर शहर,कोपरगाव व अकोले या मतदारसंघाविषयी आग्रही भूमिका घेतली आहे.काँग्रेस पक्षाची त्या सातही मतदारसंघात चांगली ताकद असल्याचा दावाही त्यांनी केला असून तिथे पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत आपल्याला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीत ऐक्य राहण्यासाठी दोन पावले मागे सरलो. एकत्रित लढलो म्हणूनच निवडणुकीत यश मिळाले,असेही पवारांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने मात्र राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.