
CPI ML Maharashtra : “'ऑपरेशन सिंदूर' चारच दिवसांत थांबवलं गेलं आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘हे आम्ही थांबवलं’. मग मोदी सरकार गप्प का? देशवासीयांना अजूनही उत्तर मिळालेलं नाही. ही सरकारची परराष्ट्र आणि संरक्षण नीतीची अपयशाची कहाणी आहे,” अशी तीव्र टीका भाकप (माले) लिबरेशनचे नेते दीपांकर भट्टाचार्य यांनी केली आहे.
तसंच 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः पुढे यायला हवं होतं. ज्या वेळी देशाला जागतिक पातळीवर समर्थन हवं होतं, त्यावेळी भारत एकटा होता. मग मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं यश नेमकं कुठे आहे? असा सवाल देखील दीपांकर भट्टाचार्य यांनी केला.
श्रीरामपूर इथल्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देशातील सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. भट्टाचार्य म्हणाले, “'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर केवळ तीन–चार दिवसांत ते थांबवण्यात आलं. नंतर ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेने ते थांबवलं. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यावर काहीही बोललेले नाहीत. देशाच्या सुरक्षेसाठी सुरू झालेल्या कारवाईचा, असा शेवट होतो हे गंभीर आहे".
''ऑपरेशन सिंदूर'च्या संदर्भात देशवासीयांना अजूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याच्या जवानांना किती नुकसान झाले, याचा कुठलाही खुलासा नाही. यामुळे सरकारच्या (Central government) पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून, देशाच्या संरक्षण धोरणांवर गंभीर संकट निर्माण झालं आहे', असा गंभीर आरोप दीपांकर भट्टाचार्य यांनी केला.
भट्टाचार्यांनी केंद्र सरकार देशासाठी राबवत असलेल्या विदेशनीतीवरही टीका केली. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या बहुतेक 11 वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक विदेशी दौऱ्यांनंतरही भारताला जागतिक पातळीवर अपेक्षित साथ मिळाली नाही आणि नॅशनल सेक्युरिटी पॉलिसी तसेच फॉरेन पॉलिसी या दोन्ही क्षेत्रात सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला लगावला.
भट्टाचार्य यांनी जम्मू–काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याचा संदर्भ देत सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले. जिथे कायम सुरक्षा व्यवस्था असते, तिथे हल्ल्याच्या दिवशी पोलिसच नव्हते. चार–पाच जण आले आणि 26 लोकांचा जीव घेतला. याला जबाबदार कोण?, असा सवाल त्यांनी केला.
दीपांकर भट्टाचार्य यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या शिष्टमंडळावरही टीका केली. 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी सरकारने थरूर यांचं शिष्टमंडळ विदेशात पाठवलं. हे काम पंतप्रधानांचं होतं. संकटाच्या वेळी मोदींनी स्वतः पुढे यायला हवं होतं. थरूर गेले म्हणजे काय घडलं? ज्या वेळी देशाला जागतिक पातळीवर समर्थन हवं होतं, त्यावेळी भारत एकटा होता. मग मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं यश नेमकं कुठे आहे?' असा सवाल केला. शिष्टमंडळ पहलगाम हल्ल्यानंतर पाठवलं असतं, तर त्याला काही अर्थ लागला असता. पण 'ऑपरेशन सिंदूर' संपल्यानंतर पाठवून सरकारनं काय सध्या केलं, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना भट्टाचार्य म्हणाले, "लोक आता डायलॉगबाजीला कंटाळले आहेत. रोड-शो, शोलेसारखे संवाद आणि घोषणांनी काही साध्य होत नाही. जनतेला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. ते संसदेत चर्चा करून दिली गेली पाहिजे".
भट्टाचार्य यांनी शेवटी स्पष्ट केलं की, "ही लढाई केवळ सरकारविरोधात नाही, तर संविधान, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या रक्षणासाठी आहे. महाराष्ट्रात आरएसएसचं मुख्यालय असलं तरी ही भूमी आंबेडकर, फुले, आणि कम्युनिस्टांची आहे. इथूनच परिवर्तनाचा संदेश जाईल".
देशात राजकीय वातावरण फारच तापलेलं आहे. पण त्याच वेळी, दोन डाव्या पक्षांनी, लाल निशान पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी लेनिनवादी लिबरेशन) हातमिळवणी करून एकत्र येऊन लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी नवा संदेश दिला आहे. हा फक्त पक्षांचा विलगीकरण नाही, तर संविधान आणि कामगार-शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सज्ज असलेली एक संयुक्त चळवळ असल्याचे, दीपांकर भट्टाचार्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.