
Malegaon Blast Case : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्खू चौकात भीषण स्फोट झाला. मालेगाव शहर या स्फोटाने हादरलं होतं. या स्फोटात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. आज (ता. ३१ जुलै) जवळपास 17 वर्षांनी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणात निकाल दिला. एनआयएकडून सादर करण्यात आलेले पुरावे आरोपींना दोषी सिद्ध करण्यास अपुरे आहेत. केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित केलं. आता न्यायालयाच्या निकालावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काही राजकीय लोकांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भगवा दहशतवाद असा उल्लेख करत या गुन्हेगारांना हिंदू धर्माशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्वांना आपल्या प्रतिक्रियेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक्सपोस्ट करत या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सत्य कधी पराभूत होत नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे. सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय अस एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंनी एक्स पोस्टमध्ये पुढे लिहलं आहे की, मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही.
हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही.सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं! जय हिंद, जय महाराष्ट्र...अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.