Dr. Hemlata Patil News: सहा वेळा नगरसेवक राहिलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला. यावेळी त्यांनी त्यांच्याबाबत घडलेले सगळेच कथन केले. पक्षाची नाशिक शहरात पक्षाची वाताहात होत असताना, वरिष्ठ नेते त्याबाबत काय करतात? असा प्रश्न त्यांनी केला.
डॉ. पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना विचारधारेशी तडजोड नाही का? याबाबत त्या बोलल्या. त्या म्हणाल्या, विचारधारा महत्त्वाची आहेच. मात्र जनतेचे प्रश्न देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. असे प्रश्न सोडविणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
नाशिक काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व हे वकूब नसलेले आहे. ते पद काँग्रेसचे घेतात मात्र विरोधकांशी छुपी तडजोड करतात. त्या दृष्टीनेच ते वर्तणूक आणि स्वतःच्या पक्षातील लोकांशी वागतात. अशा स्थितीत नाशिकमध्ये काँग्रेस पक्ष कसा वाढणार?. ज्यांचा वकूब नाही, अशा लोकांकडे पक्ष कसा शहराचे नेतृत्व कसे देतो. हे सर्व घडत असताना वरिष्ठ नेते काय करत असतात? असा माझा प्रश्न आहे.
विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारीसाठी डावलण्यात आले. मात्र केवळ या एका कारणामुळे मी काँग्रेस सोडलेली नाही. माझ्या रक्तात काँग्रेस होती. विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ नेते शेवटपर्यंत तुम्हाला उमेदवारी मिळणार. नाशिक मध्य मतदार संघ आपल्याच पक्षाकडे राहणार, असे ठामपणे सांगत होते.
ऐनवेळी शिवसेनेचे संजय राऊत थयथयाट करतात आणि पक्ष मतदार संघ सोडून देतो. असे करताना भविष्यात पुन्हा युती झाल्यास हा मतदारसंघ काँग्रेसला मिळेल का? याचा विचार नेतृत्वाने का केलं नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शहरात एकही मतदारसंघ सुटला नाही. अशा स्थितीत महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष कसा उभा राहणार. उमेदवार कसे देणार, याचा साधा विचार प्रदेश नेतृत्वाने केलेला दिसत नाही.
त्या म्हणाल्या, मी पक्ष सोडणार याची घोषणा दोन महिने आधीच केली होती. मात्र पक्ष सोडायला दीड महिन्याचा कालावधी लागला. त्याचे कारण हेच आहे की, ज्या पक्षात मी वाढले. सहा वेळा नगरसेवक झाले. त्या पक्षाशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे मी काम केलेले आहे. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील प्रामाणिक कार्यकर्ता मी आहे, असे मला वाटते. त्यामुळेच हा पक्ष कसा सोडू? यावर माझा खूप मानसिक आणि वैचारिक कोंडमारा होत होता.
अनेकदा मी भावनिक देखील होत होती. अत्यंत कठीण स्थितीत मी हा निर्णय घेतला आहे, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. त्या अत्यंत भावुक झाल्या होत्या. त्यापुढे म्हणाल्या, मतदारसंघातील शंभर ते दीडशे प्रतिष्ठित लोकांनी वरिष्ठांना डॉ पाटील यांना उमेदवारी द्या, असे दूरध्वनी करून सांगितले. गेल्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी लक्षणीय मते घेतली. असे असताना वरिष्ठ नेते काय विचार करत होते? असा प्रश्न त्यांनी केला.
नेत्यांना पक्षाचे हित कळते की नाही, असा संशय निर्माण होतो. या कालावधीत स्थानिक नेत्यांनी अतिशय घाणेरडे आणि वाईट राजकारण केले. माझ्या विरोधात सहा ते सात जणांना उमेदवारीसाठी फॉर्म भरण्यास सांगितले. जेणेकरून या मतदार संघात खूप स्पर्धा आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हेच नेते काँग्रेसमध्ये राहून काँग्रेस विरोधकांशी हात मिळवणी करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
विरोधकांचा कसा फायदा होईल असे काम शहराचे अध्यक्ष करीत असतील तर या स्थितीत नाशिक शहरात काँग्रेस पक्ष कसा वाढणार? याबाबत वरिष्ठ नेते का दुर्लक्ष करतात. अशी स्थिती ज्या पक्षात असेल तो पक्ष कसा वाढणार आणि त्याचा विस्तार कसा होणार हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे.
डॉ पाटील या महापालिकेत सहा वेळा नगरसेविका होत्या. नेतृत्व आणि संघटन यामध्ये जर्जर झालेल्या काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्या पक्ष सोडणार यावर काहीही केलेले नाही. कोणत्याही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे खरोखर काँग्रेस पक्षाला राजकारणात टिकायचे आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.