
Nashik News : महाराष्ट्राच्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतानाच राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये एक विधान करत खळबळ उडवून दिली. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केलं तरी एक वेगळा पक्ष उभा राहील,असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे बीडसह राज्याच्या राजकारणात नवं वादळ घोंघावणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महायुती सरकारच्या दुसर्या टर्ममध्ये मंत्रिपदासाठी पत्ता कट झाल्यानंतर नाराज छगन भुजबळांनी नाशिकमध्ये सोमवारी (ता.10) भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) विधानानंतर आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले,स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेबांसंदर्भात बोलायचे झाल्यास,मी एक गोष्ट सांगू इच्छितो. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री होतो.ही साधारण 2002 ची वगैरे गोष्ट असेल,मला नेमकं वर्ष आठवत नाही.
पण एकेदिवशी गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले,'भुजबळसाहेब,आपण एक वेगळा पक्ष काढू या.मी म्हणालो कसं काय? त्यावर त्यांनी गणपतराव देशमुख रामदास आठवले,तुम्ही आणि माझ्यासह आणखीही काही नेत्यांना सोबत घेत पक्ष काढू असं म्हटलं.तसेच हा पक्ष महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पुढे जाईल असंही मुंडे म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं.
गोपीनाथ मुंडे यांच्या या ऑफरनंतर छगन भुजबळ त्यांना म्हणाले,मी सध्या उपमुख्यमंत्री असून जर नवा पक्ष काढायचा झाला,तर मा पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे.तेव्हा गोपीनाथ मुंडे हे दिल्लीत भाजपचे उपनेते होते. त्यांनाही त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल असंही भुजबळांनी मुंडेंना सांगितलं.त्यनंतरच नव्या पक्षासाठी सर्व जुळवाजुळव करता येईल असंही ते मुंडेंना म्हणाले.
भुजबळ म्हणाले,नवा पक्ष काढण्याविषयी मला काही हरकत नाही.मी शिवसेनेतून ओबीसींचा मुद्दा घेऊनच बाहेर पडलो आहे.मागास किंवा इतर लहान घटकांचा पक्ष काढण्याचा विचार असेल तर विचार करायला हरकत नाही.पण नंतर पण गोपीनाथ मुंडे यांनी नवा पक्ष काढण्याचा विषय सोडून दिल्याचंही भुजबळांनी यावेळी सांगितलं.
पंकजा मुंडेंच्या विधानावरही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले,त्या म्हणाल्या,याचा अर्थ त्या ताबडतोब पक्ष काढतील, असं वाटत नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण मुंडेसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे,असा घ्यायला हवा. तसेच आजकाल कुणीही स्वतंत्र पक्ष कुणीही काढू शकतो. पंकजा मुंडे म्हणतात, त्याप्रमाणे तो मोठा पक्षही असू शकेल.
पण एका समाजावर पक्ष काढणे आणि यश मिळवणे हे किती यशदायी आहे,हे मला माहीत नाही. मग तो कोणताही समाज असेल.अनेक समाजांनी वेगवेगळे पक्ष काढले. पण ते कितपत चालले? त्यांना कितपत यश मिळाले? याचा अभ्यास त्यांनी करायला हवा असा सल्लाही भुजबळांनी यावेळी दिला.
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नवा पक्ष काढण्यासंदर्भात केलेल्या विधानाचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले.विरोधकांनी तर त्यांना नवा पक्ष काढण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
पंकजा मुंडे यांनी मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना आपण एकत्र केलं, तर एक वेगळा पक्षच उभा राहील. एवढी मोठी ताकद आणि संख्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची आहे. मुंडेसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून काम केलेलं आहे आणि तो उभा केला आहे,असं विधान केलं होतं. पण त्यावर माझा नवा पक्ष काढण्याचा कोणताही विचार नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.