Nagar News : लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने महायुतीचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केले. मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, महाविकासच्या अडीच वर्षांच्या काळात हा विचार बाजूला ठेवला गेला होता, अशी टीकाही खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
सावेडीत शिंदे शिवसेनेचा मेळावा झाला. या वेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार भाषण केले. मंत्री दादा भुसे, नगरचे महायुती उमेदवार डॉ. सुजय विखे, शिंदे शिवसेना राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले व अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव व शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.
खासदार शिंदे म्हणाले, "लोकसभेची निवडणूक पक्षाची नव्हे तर देशाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांत देशाचा जेवढा विकास केला. तसा त्याआधीच्या काळात झाला नाही. मोदींमुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला". राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अविचारी लोकांची सत्ता होती. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार बाजूला ठेवला.
कोरोना काळात हिंदू सणांवर बंदी घातली. ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार पेरला, त्याच शिवतीर्थ मैदानात भारत जोडो यात्रेच्यावेळी काहीजण खुर्च्यांसाठी लाचार दिसत होते. फारुक अब्दुल्ला व उद्धव ठाकरे हे स्टॅलिन आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर देश चालतो. पण, त्या विचारांबद्दल शिवराळ बोलणार्या राहुल गांधींच्या पंक्तीला उद्धव ठाकरे जाऊन बसले.
काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यास जागा देणार नाही, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले होते. त्यावरही उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत, अशी टीकाही खासदार शिंदे यांनी केली. या सभेत डॉ. विखे यांचे भाषण सुरू असताना साकळाईवर बोला, अशी उपस्थितांतून मागणी झाली. त्यावर ते म्हणाले, "यावर आता उत्तर देणार नाही. समोरचा (प्रतिस्पर्धी) उमेदवार ठरू द्या. त्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल".
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री शिंदेंनीच पाठपुरावा केला....
मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार शिंदे यांनी येत्या एक-दोन दिवसांत शिंदे सेनेचे राज्यातील उमेदवार जाहीर होतील. तसेच मराठा समाजाने शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या इशारा दिला आहे. यावर खासदार शिंदे यांनी मराठा समाजाला माहीत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मराठा समाजाला प्रामाणिकपणे आरक्षण दिले आहे. त्यामुळे मराठा समाज अशी भूमिका घेणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
Edited By : Umesh Bambare
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.