

MLC election vote rate : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासोबतच राज्यातील राजकीय घडामोडींनाही प्रचंड वेग आला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप, उमेदवार निवड आणि नगरसेवकांची बांधाबांध यावरून मोठी राजकीय चुरस रंगली आहे. या निवडणुकीत प्रत्येक मताला सोन्याहून अधिक किंमत मिळणार असल्याची चर्चा असून, एका मताचा भाव 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसचे (Congress) विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी तर या निवडणुकीत “100 कोटींपेक्षा मोठा व्यवहार होऊ शकतो” असा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकीभोवती पैशांचा आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीतच (Mahayuti) जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसमोर अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत चालली आहेत.
विशेषतः विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये नगरसेवक फोडाफोडीला वेग आल्याची चर्चा आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवकांना महायुतीकडून संपर्क केला जात असल्याचे बोलले जात आहे. काही नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक म्हणजे नगरसेवकांसाठी ‘दिवाळी’ ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एका मताचा दर 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करताना विजय वडेट्टीवार यांनी एका मतदारसंघात 200 ते 300 कोटी रुपयांचा व्यवहार होऊ शकतो, असा गंभीर दावा केला आहे.
राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांमध्ये आधीपासूनच मतांच्या व्यवहारांच्या चर्चांना उधाण आले होते. विशेषतः अहिल्यानगर मतदारसंघात एका नगरसेवकाचा ‘रेट’ 10 लाखांच्या पुढे जाईल, अशी चर्चा निवडणूक जाहीर होताच सुरू झाली होती.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. या जागेवरून महायुतीतील घटक पक्षांमध्येच संघर्ष असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी अजूनही उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आपापले बालेकिल्ले मजबूत ठेवले असले तरी नगरसेवक एकसंघ राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीत संगमनेर नगरपरिषदेतील नगरसेवक कोणाच्या बाजूने मतदान करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संगमनेर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जातो.
मात्र मागील नगरपरिषद निवडणुकीत आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट मैदानात उतरून निवडणुकीची सूत्रे हातात घेतली होती. त्यांनी एकहाती सत्ता मिळवत संगमनेरचा गड कायम राखला होता. आता विधान परिषद निवडणुकीत हेच नगरसेवक महायुतीच्या बाजूने मतदान करतात की महाविकास आघाडीच्या, यावर राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.