

Nashik Politics : महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून मंत्रिपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात सध्या कोकाटे यांच्याची चर्चा आहे. तीस वर्षांपूर्वी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे यांच्याविरोधात एक तक्रार दाखल केली होती. तीच तक्रार कोकाटे यांना आता भोवली असून मोठ्या कष्टाने मिळवलेलं मंत्रिपद त्यांनी गमावलं आहे.
विशेष म्हणजे ज्या तुकाराम दिघोळे यांचे बोट धरुन माणिकराव कोकाटे यांचा राजकीय उदय झाला. त्याच तुकाराम दिघोळे यांच्यामुळे कोकाटेंच्या राजकीय करिअरचा अस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा दिली असल्याने त्यांची आमदारकीही तत्काळ प्रभावाने आपोआप रद्द झाली आहे. त्यांच्याकडील सर्व खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. शिवाय आता कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
कोकाटे यांचे मंत्रीपद घालवणारे तुकाराम दिघोळे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वजनदार नेते होते. सिन्नरच्या राजकारणात दिघोळे यांचे तब्बल तीन दशके वर्चस्व होतं. याच दिघोळेंनी कोकाटे यांनाही राजकारणात मदत केली होती. दिघोळे यांनीच कोकाटे यांना पंचायत समिती सदस्य तसेच झेडपी सदस्य केलं होतं. तुकाराम दिघोळे हे १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर १९९० व ११९५ असे सलग तीन वेळा ते आमदार झाले. ज्या सदनिकेमुळे कोकाटे आता अडचणीत आले आहे ती सदनिका देखील दिघोळे यांच्यामुळेच कोकाटे यांना मिळाली होती.
परंतु १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे हे दिघोळे यांच्याविरोधात गेले होते. तेथून त्यांचे राजकीय वैर निर्माण झाले. त्यातूनच दिघोळे यांनी कोकाटे यांच्याविरोधात 1995 मध्ये सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणार्या सदनिका कोकाटेंनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक करुन लाटण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
त्यांनतर माणिकराव कोकाटे यांनी १९९९ व २००४ च्या निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा दिघोळे यांचा पराभव केला. या दोन्ही निवडणुकांमध्ये सिन्नरकरांना कोकाटे व दिघोळे यांच्यातील टोकाचा संघर्ष पहायला मिळाला. दोघांचे राजकीय संबंध त्यानंतर टोकाला गेले.
त्यानंतर २००९ मध्ये मात्र कोकाटे आणि दिघोळे यांचे पुन्हा मनोमिलन झाले. २०१४ च्या निवडणुकीत तर दिघोळे यांनी कोकाटे यांच्यासाठी प्रचार केला होता. पुढे २०१९ मध्ये तुकाराम दिघोळे यांचे निधन झाले. मात्र दिघोळे यांनी केलेली तक्रार मात्र तशीच राहिली. परंतु त्यानंतर याप्रकरणात दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे यांनी उडी घेतली. तीस वर्ष हा खटला चालला. तीस वर्षांनंतर माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.