
Nandurbar Anganwadi scam : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील बाबानगर येथील मयत अंगणवाडी मदतनिसच्या नावावर परस्पर मानधन काढून शासनाची दिशाभूल केल्यासंदर्भातील लक्षवेधी मांडून अंगणवाडी घोटाळ्यावरुन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना घेरलं. एका आमदाराने तक्रार करुन दोन महिने झाले तरी वरीष्ठ अधिकारी त्याला दाद देत नाहीत तर सर्वसामन्यांचे काय असा सवाल पाडवी यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात भाभानगर येथे १९९६ पासून मदतनीस काम करत होती. तिचे निधन झाल्यानंतरही २००६ मध्ये तिच्या जागेवर दुसऱ्या महिलेला पगार दिला गेला. मयत शांताबाई यांच्या निधनानंतरही पुढचे सहा महिने दुसऱ्या महिलेला त्या महिलेच्या नावाने पगार दिला गेला. त्यांच्या मुलाने माझ्याकडे येऊन तक्रार केली की, माझी आई जिवंत असताना पगार दिला नाही, परंतु आता तिचे निधन झाले आहे तर तिच्या नावाने दुसऱ्या महिलेला पगार दिला गेला आहे. पगार काढून देणारे सीडीपी व सुपरवायझर यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आमश्या पाडवी यांनी केली.
आमदार पाडवी पुढे म्हणाले, जिल्ह्याचे कलेक्टर व सीईओ यांच्याकडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो त्यावेळी त्याची दखल घेतली गेली पाहिजे. पंरतु ती घेतली गेली नाही. एक महिला मेली आहे आणि तीच्या नावाने दुसरी महिला पगार घेत आहे. यासंदर्भात दोन महिने तक्रार करुन झाले तरी ना सीईओ ने ना कलेक्टरने त्याकडे लक्ष दिलं. डीपीडीसीच्या मीटींगमध्येही हा विषय झाला तरी कोणतीही चौकशी त्यावर केली नाही असं पाडवी म्हणाले.
जेव्हा कलेक्टर व सीईओच्या विरोधात मी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा कुठे दोन महिन्यांनंतर जी महिला मयत मदतनिस महिलेच्या नावाने पगार खात होती तिला निलंबीत केलं. परंतु पगार काढून देणारे सीडीपी व सुपरवायझर यांच्यासह कलेक्टर व सीईओ यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मंत्री महोदय आपण यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल त्यांनी आदिती तटकरे यांना केला.
त्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. संबधित जी मयत अंगणवाडी मदतनिस आहे. शांता जयंतीलाल तडवी यांची १ सप्टेंबर १९९६ रोजी ५० रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानंतर नियमीत अंगणवाडी केंद्रात २००६ मध्ये अंगणवाडी मध्ये मदनिस म्हणून ७४० मानधन नियुक्ती करण्यात आली होती. संबधित जी मयत अंगणवाडी मदतनिस आहे. यांच्या जाऊ बाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्या जागी कामकाज करत होत्या.
अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी श्री शांता जयंतीलाल तडवी यांच्याच घरात भरत होती. आणि त्यांचीच जाऊ बाई यांनी त्यांच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करुन त्या तिथे कामकाज करत होत्या. शांता जयंतीलाल तडवी यांचे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले व त्यांच्या ऐवजी काम करत असलेल्या महिलेची तक्रार आमदारांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे २१ फेब्रवारी रोजी केली. त्यानंतर लगेचच २४ फेब्रुवारीला या संदर्भातील समिती स्थापन केली. त्यानंतर या समितीचा अहवाल २३ -३ -२०२५ मध्ये प्राप्त झाला. आणि २० मे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भात कडक कारवाई केली जाईल असा शब्द आदिती तटकरे यांनी दिला.
परंतु कडक कारवाई कुणावर करणार असा प्रश्न पाडवी यांनी तटकरे यांना केला. त्यावर आम्ही सुपरवायझर ची चौकशी केली आहे. आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे सीडीपीओ , सुपरवायझर यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.