
Nashik News, 24 Dec : नुकतेच मंत्री झालेले नितेश राणे यांना काल आपल्या पहिल्याच कार्यक्रमात चांगलाच झटका बसला शेतकऱ्यांनी केलेल्या अनोख्या आणि अचानक कृतीने राणे देखील स्तब्ध झाले. किंबहुना त्यांना भोवळ येता येता राहिली.
भाजपचे (BJP) नितेश राणे नुकतेच मंत्री झाले आहेत त्यांनी सोमवारी चिराई (सटाणा) येथील फिरत्या नारळाच्या उत्सवाला हजेरी लावली. मंत्री झाल्यानंतर नाशिकला झालेला त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यांचा दौरा विविध कारणांनी दिवसभर चर्चेचा विषय होता.
खानदेशमध्ये विशेष लोकप्रिय आणि मोठी गर्दी होणाऱ्या फिरत्या नारळाचा कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय असतो. विविध पारायण आणि कीर्तन यांनी तो साजरा होत असतो. राजकीय नेत्यांची हजेरी नेहमीच येथे बातमीचा विषय होऊन जाते. अशीच मोठी बातमी काल मंत्री राणे यांच्या संदर्भात घडली.
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) या कार्यक्रमाला उपस्थित होते ते व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी गेले, त्याच वेळी अचानक एक शेतकरी व्यासपीठावर आला त्याने कांद्याची माळ राणे यांच्या गळ्यात घातली. त्यामुळे एकच खळबळ उडाली नितेश राणे देखील अचानक झालेल्या या प्रतीकात्मक निषेधाच्या आंदोलनाने स्तब्ध झाले.
कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला व्यासपीठावरून खाली नेले. त्यानंतर राणे थोडे सावरले. त्यांनी त्या शेतकऱ्याला थांबवा. त्याचे काय म्हणणे आहे, ते मी ऐकून घेतो अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. हे सर्व एवढे अचानक घडले की उपस्थित आणि पोलिसही गोंधळले होते. त्या कार्यकर्त्याला खाली नेल्यानंतर पुढे काय झाले?
याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र, त्या शेतकऱ्याचे नाव समजू शकले नाही. कांद्याची माळ मंत्र्यांना घालून त्याने कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याकडे राज्यातील आणि केंद्रातील सरकारचे लक्ष वेधले. त्यात मात्र तो चांगलाच यशस्वी झाला. एरव्ही आक्रमक आणि धार्मिक ध्रुवीकरणाची विधाने करणारी राणे यावेळी मात्र स्वतःच स्तब्ध झाले.
कांदा उत्पादकांनी त्यांना चांगलाच झटका दिला, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कांद्याचे भाव अतिशय वेगाने गडगडले आहेत. शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. निवडणुकीदरम्यान कांद्याला चांगला दर होता. मात्र, त्यानंतर दर कोसळल्याने सरकार टीकेचे लक्ष्य बनले आहे.
सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. या संदर्भात केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार निर्यात बंदी करीत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या संदर्भात राजकीय नेते आणि सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी केली जाते, अशी नाराजी यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.