
MNS protest Nashik : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडुंब भरली आहेत, असे असतानाही शहरातील अनेक भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच रस्त्यांची दुरावस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी नाशिक महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. शहरातील प्रश्नांना घेऊन मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या समस्या न सुटल्यास मनसेने तीव्र आंदोलनाचा इशारा महापालिकेला दिला.
प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पाटील यांनी सत्ताधारी महायुतीचे जिल्ह्यातील मंत्री व महापालिका आयुक्तांवर जोरदार हल्लाबोल केला. दिनकर पाटील म्हणाले, शहरातील पाणी प्रश्न, रस्त्यांच्या खड्ड्यांच्या प्रश्न याबाबत महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. अधिकारी कामच करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सगळे लोक आंदोलनं करत आहेत तरी आयुक्त मॅडम लक्ष देत नाही असा आरोप दिनकर पाटील यांनी केला.
पाटील म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील सगळी धरणं पाण्याने तुडुंब भरली आहेत तरी शहरवासीयांना प्यायला वेळेवर पाणी नाही. नाशिकमध्ये कुंभमेळा एका वर्षांवर येऊन ठेपला आहे. त्यादृष्टीने शहर खड्डे मुक्त करण्याची गरज आहे. नद्या प्रदूषण मुक्त करण्याची गरज आहे. आयुक्तांना आम्ही तीन ते चार वेळा निवेदन दिलं, आंदोलन केलं पण आयुक्त मॅडम ऐकायला तयार नसल्याचं पाटील म्हणाले.
महायुती शंभर प्लसचा नारा देत आहे. अरे चार-चार मंत्री जिल्ह्याला आहे. यातला एकही मंत्री जनतेच्या प्रश्नावर बोलत नाहीत. त्यांना फक्त सिंहस्थाची मलई खायची आहे. जनतेला पाणी मिळावं, शहर खड्डे मुक्त व्हावं यावर एक तरी मंत्री बोलला का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्हीच सत्तेवर आहात, मलई खाणार आहात पण अगोदर लोकांना सुविधा द्या. प्यायला पाणी द्या. नद्या प्रदूषण मुक्त करा. रस्ते खड्डेमुक्त करा. मलई तुम्हीच खाणार आहात. दुसरं कोण खायला आहे. टेंडरही तुम्हीच घेत आहे असा हल्लाबोल दिनकर पाटलांनी केला.
नाशिकला आजूनही पालकमंत्री नाही यासंदर्भात विचारले असता दिनकर पाटील म्हणाले. कोणताही पालकमंत्री करा त्यांना पैसा खायचा असतो, मलई खायची असते. काय करणार आहे, पालकमंत्री नेमून? या आधी काय पालकमंत्री झाले नाही का? त्यांनी काय काम केलं ते दाखवा. दत्तक नाशिक घेतलं होतं सोडावला का एखादा प्रश्न. अहो चार चार मंत्रीच काही काम करेना तर एकटा पालकमंत्री काय काम करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान मनसेने पालिकेला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. शहरातील विविध भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते खड्डे मुक्त करावे, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करावी अन्यथा जनआंदोलनाचा इशारा मनसेने पालिका प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.