
Nashik Politics : सरकारकडून जानेवारी महिन्यात सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेकडून विरोध वाढल्याने दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली गेली. महायुती सरकारला जवळपास आठ महिने आता पूर्ण होतील मात्र आजूनही या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. अशात आता १५ ऑगस्ट जवळ आल्याने ध्वजारोहण कोण करणार हा मोठा प्रश्न पडला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट झाली असून या भेटीत तटकरेंनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत शिंदेंशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्या भेटीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी यांसदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली आहे. त्यावरुन १५ ऑगस्ट पर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.
जर रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन तटकरेंनी शिंदे यांच्यासोबत चर्चा केली असेल तर त्यांनी नाशिकबद्दल सुद्दा चर्चा करायला पाहीजे असं भुजबळांनी म्हटलं आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांचा समावेश आहे. त्यापार्श्वभूमीवर भुजबळांनी केलेलं हे विधान महत्वपूर्ण ठरतं. कारण रायगडसोबत नाशिकचाही तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे नाशिकवरही चर्चा व्हावी असे भुजबळांचे म्हणणे आहे.
दरम्यान नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा असल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाला विशेष महत्व राहणार आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार यावरुन सुरुवातीपासून स्पर्धा आहे. गिरीश महाजन यांच्या नावाला शिवसेनेतून विरोध झाल्याने पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली गेली होती. शहरात कुंभमेळा असूनही गेली आठ महिने झाले जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यात भुजबळ हे सुरुवातीपासून पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सर्वांधिक आमदार असल्याने पक्षाने यापूर्वी पालकमंत्रीपदासाठी अनेकदा दावा केला आहे. अशात भुजबळांनी पालकमंत्रीपदाबाबत विधान केल्याने जिल्ह्यात पुन्हा त्याच जुन्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमधून हळहळू काही नावं आपोआप कमी झाली. त्यात माणिकराव कोकाटे यांचा पहिला नंबर आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम अडचणीत सापडत राहीले. कृषीखाते गमावून बसले. त्यानंतर आपोआपच नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून त्यांचा पत्ता कट झाला. आता एका प्रकरणात दादा भुसेंनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ व गिरीश महाजन या दोघांचाच मार्ग जरा मोकळा आहे. मात्र त्यातही कुंभमेळा असल्याने भाजपने हे पद प्रतिष्ठेचं केलं आहे, त्यामुळे रायगड सोबत नाशिकचा निर्णय होतो की तिढा कायम राहतो हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.