

Nashik UPSC Exam : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ((UPSC) माध्यमातून देशभरात आज रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘सीडीएस (२)’ आणि ‘एनडीए व एनए (२)’ या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.
या परीक्षेसाठी नाशिकमधील डोंगरे वसतीगृह मैदानाजवळील केव्हीएन नाईक महाविद्यालयात केंद्र तयार करण्यात आले होते. या केंद्रावर मोठा गोंधळ झाला. काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला त्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. अवघा दोन मिनिटांचा उशीर झाला असतानाही परीक्षेला बसू दिले नाही असा दावा विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे.
यावेळी, प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थी व त्यांच्या सोबत त्यांच्या पालकांनी या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. केंद्राबाहेर पालक आणि प्रशासनात जोरदार वाद झाला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील खोदून ठेवलेले रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे मॅपवर योग्य मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे केंद्रावर पोहोचण्यास थोडा उशीर झाल्याचा दावा विद्यार्थ्यांसह पालकांनी केला.
आम्ही काय चोर किंवा गुंड आहोत का? असा सवाल उपस्थितीत करत केवळ १० सेकंदांच्या उशिरामुळे आमचा शेवटचा अटेम्प्ट आम्हाला देता आला नाही. परीक्षा देऊ न दिल्याने आमचे संपूर्ण वर्ष वाया जात आहे, अशी आर्त हाक मारत विद्यार्थी पोलिसांसमोर विनवणी करताना दिसले.
दहा वाजता हा पेपर सुरु होणार होता. ९:30 वाजता विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं जाणार होतं. मात्र, चार ते पाच विद्यार्थ्यांनी साडे नऊ वाजेपेक्षा दोन-चार मिनीटे उशीर झाल्याने आतमध्ये घेण्यात आलं नाही असा दावा विद्यार्थ्यांनी केला. इतर काही परीक्षा केंद्रांवर पाऊणे दहा (९.४५ ) वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता, मग याच केंद्रावर एवढी कडक कारवाई करत प्रवेश का नाकारण्यात आला असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला. गेटवरील सुरक्षा रक्षकांनी मात्र, नियमांचे पालन केल्याचे म्हटले.
दरम्यान यासंदर्भात प्रशासनाची बाजू मांडताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, "UPSCच्या परीक्षांचे नियम अत्यंत कडक असून केंद्र स्तरावरून नियंत्रित केले जातात. निवडणुकीप्रमाणेच या परीक्षेला देखील वेळेच्या बाबतीत नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. त्यामुळे एकदा गेट बंद झाल्यानंतर स्थानिक प्रशासन त्यात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेले रस्ते खराब असल्याचे दावे प्रशासनाकडून फेटाळण्यात आले आहेत. वेळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. संबंधित परीक्षार्थीनी विलंबाचे कारण रस्त्यावरील वाहतूक व खड्डे असल्याचे सांगितले; तथापि संबंधित केंद्रांच्या परिसरात सद्यस्थितीत कोणतेही मोठे रस्ते दुरुस्ती अथवा खोदकाम सुरू नसल्याने हे कारण वस्तुस्थितीला धरून नाही असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.