
Sinnar election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे पक्षाचे प्रमुख नेते उदय सांगळे यांची ‘एकला चलो’ची भूमिका अधोरेखित झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भूमिकांकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
तालुक्यातील राजकीय समीकरणांत झालेले बदल लक्षात घेता अनेक इच्छुक नेते वैयक्तिक पातळीवर रणनीती आखण्याच्या हालचाली करत आहेत. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदांमधील गणित वेगळे असते. येथे प्रबळ दावेदार होण्याबरोबच नेतृत्वाचा पाठिंबा आणि पक्षश्रेष्ठींची मर्जी असणे महत्वाचे ठरणार आहे.
वाजे आणि कोकाटे यांच्यातील जवळीक तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आता नवीन राहिलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते स्वतंत्र लढणार की एखादी सामूहिक भूमिका स्वीकारणार, याबाबत अद्यापही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. या अनिश्चिततेमुळे कार्यकर्त्यांबरोबरच विरोधकांच्याही मनात त्यांच्याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. मात्र दोघांमधील सलगीचा उदय सांगळे यांना विधानसभेला फटका बसला. त्यातून शहाणे होत सांगळे यांनी आता एकट्यानेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केलेला स्वबळाचा नारा येथे अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची आगामी निवडणूक भूमिका स्वतंत्र आणि वेगळी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगळे यांच्याकडून इच्छुक असलेल्यांसाठी ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
माणिकराव कोकाटे कृषीमंत्री झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राजकारणात कोकाटे यांची भूमिका निर्णायक असल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या चौकटीत भाजप सोबत राहणार की वेगळा निर्णय घेणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तालुक्यात घडवलेला विस्तार पाहता त्यांच्या आगामी भूमिकेकडेही राजकीय निरीक्षकांच्या नजरा लागून आहेत."
शिवसेना ठाकरे गटाची तालुक्यात चांगली ताकद आहे. पंचायत समिती व नगर परिषदांमधील सत्ताधिकार, तसेच बाजार समितीत साधलेले परिवर्तन, यामुळे कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. लवकरच गट आणि गणनिहाय दौरे पार पडणार असून, त्यातून खासदार राजाभाऊ वाजे यांची पुढील दिशा व भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.