NCP Crisis : 'सध्या राजकीय संकट, पण तुम्ही पाठीशी राहा'; जयंत पाटलांची भावनिक साद

NCP News : सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून भाजप राजकीय पक्षावर दरोडा घालतंय, असा आरोप जयंत पाटील यांनी कर्जतमधील राष्ट्रवादी 'विजय निश्चय' मेळाव्यात केला.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : "महाराष्ट्रात राजकीय पक्षावर दरोडा घालण्याचे काम होत असून, सरकारी यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करते, याची खंत वाटते. या कार्यपद्धतीने देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सक्षमपणे उभारण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हास पार पाडायची आहे. कालच्या निर्णयाने पक्ष आणि चिन्ह गेले असले तरी पवार साहेबांचा विचार जन सामान्यात रुजविण्याचे काम मोठ्या जिद्दीने पुढे नेऊयात. पक्ष, चिन्ह गेले पण आमचा 84 वर्षांचा तरुण योद्धा आमच्यामागे खंबीरपणे उभा असून, तोच आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह", असे सांगत जयंत पाटलांनी अजित पवार गटाला सुनावलं. (Jayant Patil On NCP Crisis Ajit Pawar)

कर्जत येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दंडाला काळ्या पट्ट्या लावत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विरोध केला. तर जयंत पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सध्या राजकीय संकट आहे, मात्र तुम्ही पाठीशी उभं राहा, असं भावनिक आवाहन केलं. या वेळी आमदार रोहित पवार, मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे यांच्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil
Sharad Pawar News : अजित पवारांच्या 'त्या' सहा आमदारांचा शरद पवारांनी आधीच बंदोबस्त केला?

जयंत पाटील म्हणाले, "दीड वर्षात दोन मोठे पक्ष फोडण्याचे काम या राज्यात घडले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेमध्ये प्रभावित असताना पक्षाची मालकी फोडली गेली. पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली गेली. हा नवीन पायंडा राजकारणात पडत आहे. रोहित पवार यांना बाहेर घेऊन जाऊ का ? असं विचारताच निश्चित न्या. आम्ही त्यांचे विचार जनतेसमोर घेऊन जाऊ, अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली. कार्यकर्त्यांचा नेता होतो. मात्र तोच नेता तुमच्या जिवावर मोठा होत असतो. आज पदाधिकारी निवडी झाल्या, पण कोणत्या पक्षाच्या झाल्या हे सांगता येत नाही, याचे शल्य आहे. पण न्यायालयीन लढाईत आपले पक्षाचे नाव आणि चिन्ह नक्की पुन्हा मिळवू, असा विश्वास जयंत पाटील यांनी उपस्थितांना दिला.

आज जे चिन्ह आणि पक्षाला नाव मिळेल, ते जनतेमध्ये रुजविणे आपली जबाबदारी आहे. पक्ष किंवा चिन्हापेक्षा पवार साहेबांचा विचार महत्त्वाचा आहे. आता पोलिस ठाण्यात गोळीबार करून न्याय मिळवण्याचा नवीन प्रकार भाजपच्या या राज्यात सुरू झाला आहे. ज्याला गोळी मारली तो मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. हे विशेष म्हणावे लागते. असा प्रकार या महाराष्ट्रात घडतोय याचे दुःख वाटते. आज राजकारणात गुन्हेगारीकरण येत आहे. राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव होत आहे. सत्तेसाठी एकमेकांच्या अगतिकता सहन केले जाते. हे कुठले राजकारण आहे, असा सवालही त्यांनी केला.

ज्येष्ठ मंत्र्यास एक आमदार पेकाटात लाथ घालण्याची भाषा करतो. त्यांना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री साधा शब्द बोलता येत नाहीत. कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र ? याचे भान सत्ताधारी सरकारला नाही, याची शोकांतिका वाटते. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या दोन समाजात मनभेद करण्याचे पाप सरकार राजरोसपणे करीत आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. महागाई वाढत असून, केंद्र आणि राज्य सरकार गप्प का ?, असा सवाल उपस्थित करत दोन्ही सरकारचे वाभाडे काढले. सध्या राजकीय संकट आहे. मात्र, पाठीशी उभे राहा आणि आगामी निवडणुकीत पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवावा, असे भावनिक आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थितांना केले.

(Edited By-Ganesh Thombare)

Jayant Patil
Mahayuti News : मोठी बातमी ! 'महायुती'त आणखी एका पक्षाची एन्ट्री; भाजपला किती फायदा होणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com