

Nashik Politics : तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी सुरु केलेल्या आंदोलनात सहभाग घेत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटाने याआधीच भाजपची कोंडी केली होती.
सुरुवातीला राष्ट्रवादीचे सयाजी शिंदे यांनी या आंदोलनात उडी घेत तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा पवित्रा घेतला. तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावू या मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला. सयाजी शिंदे यांच्या सहभागाने या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सयाजी शिंदे यांची पाठराखण करत शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखायला हवा अशी भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केल्याने भाजपची पहिली कोंडी तिथे झाली.
त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेतेही तपोवनात पोहचले. त्यांनीही वृक्षतोडीला विरोध करत पर्यावरण रक्षणाची भूमिका मांडली. महायुतीमधील या दोन्ही घटक पक्षांच्या भूमिकेने भाजप एकाकी पडले. या दोन्ही पक्षांनी केवळ तिथवरच न थांबता काल नाशिकमध्ये झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमासही अनुपस्थित राहून भाजपचे 'डॅमेज कंट्रोल' फोल ठरवले.
नाशिक जिल्ह्यात महायुतीचे चार मंत्री आहेत. वृक्षतोडीसंबधी यातील एकाही मंत्र्याने चकार शब्दही काढला नाही. तपोवनाती वादाचे 'डॅमेज कंट्रोल'करण्यासाठी मंत्री महाजन यांनी नाशिकमध्ये वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी झालेल्या वृक्षारोपण, तसेच ई-भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी या चारही मंत्र्यांना आमंत्रण होतं. मात्र एकही मंत्री तिकडे फिरकला नाही.
महायुतीत तीन मित्रपक्ष असतानाही भाजपने कुंभमेळ्याच्या विकासकामांचे श्रेय नेहमी एकट्याने घेतले. कधीही घटक पक्षाचे मंत्री व आमदारांना सहभागी करुन घेतलं नाही. आता तपोवनातील आंदोलनामुळे सरकारविरोधात रोष वाढला आहे. त्यामुळे हा रोष कमी करण्यासह मित्रपक्षांनाही भाजपने वृक्षारोपण आणि ई-भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, श्रेय तुम्ही घेता, मग आता रोष आणि बदनामीही तुम्हीच घ्या, आम्ही यापासून दूरच राहणार, अशी भूमिका एका मित्रपक्षाच्या नेत्यानेच नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.
महायुतीत तीन मित्रपक्ष असतानाही सिंहस्थातील विकासकामांचे श्रेय भाजप घेत आहे. त्यामुळे घटकपक्षांच्या मंत्र्यांसह आमदारांचीही नाराजी आहे. तपोवनातील आंदोलनामुळे सरकारविरोधात रोष वाढला आहे. तपोवनातील जागेवर साधुग्राम उभारण्याऐवजी तेथे 'पीपीपी' तत्त्वावर २२० कोटी रुपये खर्चुन औद्योगिक प्रदर्शन केंद्राची निविदा काढल्याने वृक्षप्रेमींसह राजकीय पक्षांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केला आहे.
मात्र या वादाचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपने वृक्षारोपण आणि ई-भूमिपूजन कार्यक्रम ठेवला. मित्रपक्षांनाही त्याचे आमंत्रण दिले. परंतु विकासाचे श्रेय तुम्ही घेता, मग आता रोष आणि बदनामीही तुम्हीच घ्या, आम्ही यापासून दूरच राहणार या विचारातून आम्ही या प्रकरणापासून दूर राहिलो अशी भूमिका एका मित्रपक्षाच्या नेत्यानेच नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.