सेनेचे सर्व खासदार कामाला, पण भावना गवळी शिवसंपर्क अभियानातून गायब !

सेनेचे सर्व खासदार विदर्भ आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये आज पोहोचले. पण आज चर्चा सुरू आहे ती वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची.
Bhawana Gawali
Bhawana GawaliSarkarnama

नागपूर : शिवसेनेने विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. सेनेचे सर्व खासदार विदर्भ आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये आज पोहोचले. पण आज चर्चा सुरू आहे ती वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) यांची. कारण या अभियानातून त्या गायब आहेत.

आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या शिलेदारांना विदर्भातील जिल्ह्यांचे टार्गेट देऊन रवाना केले आहे. येणारे तीन दिवस सेनेचे हे खासदार त्यांना ठरवून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये तळ ठोकून बसणार आहेत. या काळात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कार्यकर्ता संवाद यात्रेवर पाठवले होते. आता शिवसेनेने संवाद यात्रा सुरू झाली आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसंपर्क अभियानासाठी काल रात्री राज्याच्या उपराजधानीत दाखल झाले. काल रात्री त्यांनी विमानतळावर उतरताच पत्रकारांशी संवाद साधला आणि आज पत्रकार परिषदही घेतली. या दरम्यान सर्वाधिक चर्चा झाली ती विदर्भाच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची. कारण या अभियानात त्या कुठेही दिसल्या नाही आणि त्यांच्या मतदारसंघात प्रतापराव जाधव यांची ड्युटी लावण्यात आली आहे. धडाडीच्या खासदार भावना गवळी त्यांच्या मतदारसंघात तर नाहीच, पण विदर्भातील इतर कुठल्या जिल्ह्यातही त्यांचे नाव शिवसंपर्क अभियानात दिसले नाही, त्यामुळे चर्चा तर होणारच होती.

Bhawana Gawali
''भावना गवळी अजून किती दिवस बाहेर राहाल?"

सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्यामुळे पक्षात त्यांचे चांगले वजन आहे, असे सांगितले जात होते. मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकते, अशाही चर्चा २०१९च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केल्या गेल्या. पण मंत्रि‍पदाची माळ काही त्यांच्या गळ्यात पडली नाही. त्यामुळे त्यावेळी त्या पक्षनेतृत्वावर नाराज असल्याही बोलले जात होते. पण नंतरच्या काळात त्या सक्रिय झाल्या होत्या. कापूस, पीकविमा आदी मुद्द्य़ांवर त्यांनी आंदोलने केली, ती आंदोलने चांगली गाजलीसुद्धा. पण दरम्यानच्या काळात त्यांच्या वाशीम येथील प्रकल्पाची ईडी चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्या फारशा कुठे दिसल्या नाहीत आणि या अभियानातूनही त्या गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com