

नागपूर : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर शासनाला आजवर आठवेळा स्मरणपत्र देण्यात आले. त्याची कोणतीच दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे आता कर्जमाफीचा शासन आदेश निघाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला. बच्चु कडू यांनी सरकारी आदेशाशिवाय हटणार नाही असा इशारा देऊन रस्त्यावरच ठाण मांडले असल्याने महायुती सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर धडक देण्याचा तसंच उद्या दुपारी १२ वाजता रेल्वे बंद करुन 'भारत बंद' करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी महाऐल्गार आंदोलन पुकारले असून अमरावती जिल्ह्यातून आंदोलनकर्ते आज सायंकाळी साडेसहा वाजता नागपूरच्या वेशीवर धडकले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (क्रांतीकारी) अध्यक्ष रवीकांत तुपकर, अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. या मोर्चामध्ये ५०० पेक्षा अधिक ट्रॅक्टर त्यांच्यासोबत होते.
त्यामुळे बेलोरा ते नागपूर मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक प्रभावित झाली होती. बच्चू कडू म्हणाले, शासनाने विधानसभा निवडणूकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले. परंतू त्याची पूर्तता करण्यात आली नाही. शासनाने शेतकऱ्यांना गृहित धरल्याने शेतीक्षेत्रासमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. अतिवृष्टीच्या भरपाईत देखील दुजाभाव करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करण्यात आला होता. उत्पन्न तर नाही परंतू खत, डिझेल, पेट्रोल दरात वाढीच्या माध्यमातून त्यांचा उत्पादकता खर्च मात्र दुप्पट, तिप्पट करण्यात आला. मजूरी खर्चातही मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणीत कोलमडले आहे. त्यामुळेच शेती कामांचा समावेश रोजगार हमी योजनेत व्हावा, अशी मागणी आहे. त्याची देखील पूर्तता गेल्या अनेक वर्षात करण्यात आली नाही. दिव्यांगाचे मानधन वाढीचा मुद्दाही प्रलंबीत आहे. त्यासोबतच मेंढपाळही अनेक सोयी सुविधांपासून वंचीत आहे. अशा सर्व आश्वासनांची पूर्तता शासनाने तत्काळ करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. शक्तीपीठसाठीचे सक्तीचे भुसंपादन रद्द करुन त्याऐवजी हा पैसा शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ वापरावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनाची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरातील निवासस्थानावर सायंकाळी चार ते पाच वाजता धडक देणार असल्याचा इशारा कडू यांनी दिला होता. परंतू सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा ताफा नागपूरात दाखल झाला. त्यामुळे नियोजनीत आंदोलन होऊ शकले नाही.आंदोलनात शेतकऱ्यांचा चेतवणारे भाष्य बच्चु कडू यांनी नागपूर पोहोचताच केले. कर्ज मुक्ती हाती घ्यायची असल्यास आपल्याला निर्धार करावा लागेल. त्यासाठी केवळ नागपूरच नव्हे तर कधी महाराष्ट्रात चक्काजाम करण्याची वेळ आल्यास तुम्ही तयार रहा. या खेरीज शासनाने न ऐकल्यास संपूर्ण देशभर आपण आंदोलन करु, असे बच्चु कडू यांनी नमूद केले. आपल्या या आंदोलनाच्या निर्णयामुळे आपल्या आयुष्यभराची सोय होईल. ही लढाई केवळ कर्ज मुक्ती नाही, केवळ हमीभावासाठी नसून शेतकऱ्यांच्या जीवासाठी अन् संपूर्ण शेतकरी समाजासाठी आहे. पैसा नाही असे सरकार म्हणत असल्यास एकट्या मुंबईसाठी बजेटमध्ये एक ते दीड लाख कोटींची तरतुद कुटून करण्यात आली, हे सरकारने सांगावे, असा प्रश्न देखील शासनाला केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.