
Nagpur News : महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. सर्वच नेत्यांकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता. मात्र त्यांनी आंदोलन अचानक मागे घेतले. त्यावरून त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या भूमिकेवर शंकासुद्धा घेतली जात होती. यावर कडू यांनी आपले मौन सोडले आहे. तर विरोधकांना सडेतोड उत्तरही दिले आहे. ते म्हणाले, आंदोलनावर माझी पीएचडी आहे. आजवर आंदोलनाचा विक्रम माझ्या नावावर आहे. विशेष म्हणजे माझ्या आंदोलनाचा सक्सेस रेट 80 टक्के आहे. आंदोलन करून सरकारला 182 शासनादेश काढायला लावले आहेत. दोन महिन्यांपूर्वी कर्जमाफीला नकार देणारे सरकार आता योग्य वेळी ती देऊ ही भाषा बोलायला लागले लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
तसेच सरकार आता कर्जमाफीबाबत समिती स्थापन करण्यास भाग पाडले असून समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी देऊ हे बोलायला लावले. ही आमच्या आंदोलनाची आणि उपोषणाची उपलब्धी आहे. कर्जमाफी करण्यास वेळ लागणार आहे. उद्योजक, श्रीमंत, करदाते, खासदार, आमदारांचा कर्जमाफीत समावेश करू नये अशी आमची मागणी आहे.
याकरिता थोडा वेळ लागणार आहे. मात्र वेळकाढूपणा केला तर आम्ही आंदोलनसाठी पुन्हा मोकळे आहोत. आम्ही आंदोलन मागे घेतले नाही तर स्थगित केल्याचेही कडू यांनी सांगितले. आंदोलन करून शेतकऱ्यांना मरू द्यायचे नव्हते. आंदोलनकांवर गुन्हे दाखल होऊ द्यायचे नव्हते. आंदोलन केव्हा करायचे व केव्हा माघार घ्यायची याचा चांगला अभ्यास मला आहे. उपोषण सुरूच ठेवले असते तर अनेकांना जीव गमावावा लागल असता याकडेही कडू यांनी लक्ष वेधले.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. महायुतीच्या जाहीरनाम्यातही याचा समावेश केला होता. सत्ता आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी आम्ही असे काही बोललेच नव्हतो अशी भूमिका घेतली होती. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हात झटकले होते. यानंतर माजी आमदार बच्चू कडू यांच्यातील आमदार जागा झाला. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे आमरण उपषोण सुरू केले होते.
आंदोलन चिघळत असल्याचे बघून राज्य सरकारने राज्याचे महसूलमंत्री व अमरातवीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मध्यस्थीसाठी पाठवले होते. उद्योगमंत्री उदय सामंतही यांनीही नंतर मध्यस्थी केली. कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित केले.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शरचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने समर्थन जाहीर केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आंदोलनस्थळी जाऊन आले. जरांगे पाटील यांनीसुद्धा बच्चू कडू यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. केंद्र सकराच्या विरोधात तीन काळे कायदे मागे घ्यावे यासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांनीही कडू यांच्या आंदोलनाला प्रोत्साहन दिले होते. यानंतर फक्त शाब्दिक आश्वासनावर कडू यांनी आंदोलनमागे घेतल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यांनी सरकारशी ‘मांडवली‘ केल्याचाही आरोप केला जात होता. यास आज बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.